मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ट्रॅफिक जामचा भयानक Video...! नागमोडी वळणांचा एरिअल व्ह्यू, २४ तासांपासून आहे बंद...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:02 IST2026-02-04T19:59:27+5:302026-02-04T20:02:22+5:30
Mumbai Pune Expressway Traffic Jam Photo, video: मुंबई-पुणे महामार्गावर २४ तासांपासून हजारो प्रवासी अडकले आहेत. नागमोडी वळणांवरील वाहनांच्या रांगांचे फोटो व्हायरल झाले असून, सद्यस्थिती आणि पर्यायी मार्गांबद्दल जाणून घ्या.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील ट्रॅफिक जामचा भयानक Video...! नागमोडी वळणांचा एरिअल व्ह्यू, २४ तासांपासून आहे बंद...
मुंबई आणि पुण्याला जोडणारा 'लाईफलाईन' महामार्ग सध्या प्रवाशांसाठी एक भयानक स्वप्न ठरला आहे. अदोशी बोगद्याजवळ झालेल्या भीषण टँकर अपघातामुळे गेल्या २४ तासांपासून हा महामार्ग पूर्णपणे ठप्प आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एरिअल व्ह्यू (Aerial View) फोटोंमध्ये खंडाळा घाटातील नागमोडी वळणांवर किलोमीटरपर्यंत केवळ वाहनांच्या रांगा दिसत आहेत, जणू हा महामार्ग नसून वाहनांचे एक महाकाय सर्प असल्याचेच भासत आहे.
काल संध्याकाळपासून प्रवासात असलेल्या हजारो कुटुंबांना महामार्गावरच रात्र काढावी लागली आहे. लोणावळ्यापासून ते थेट खालापूर टोलपर्यंत वाहनांच्या रांगा पसरल्या आहेत. एरिअल व्ह्यूमध्ये दिसणारी नागमोडी वळणे सध्या वाहनांच्या गर्दीने गुदमरून गेली आहेत. या २४ तासांत वाहने हळूहळू पुढे सरकली आहेत. मोठमोठाले ट्रेलर, ट्रकतर तिथेच अडकून पडले आहेत.
टँकरमधून होणारी गॅस गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी तज्ज्ञांना प्रचंड मेहनत करावी लागत आहे. थोडीही ठिणगी मोठा स्फोट घडवू शकते, त्यामुळे प्रशासनाने धोका पत्करण्यास नकार दिला आहे. काही वेळापूर्वीच हा टँकर हटविण्यात आल्याचे समजते असून वाहतूक सुरु होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.
A 20+ hour traffic jam on Mumbai Pune Highway. As per the government's own estimates apart from private vehicles 163 state transport buses have also been stuck. Think of the plight of women and children who have been stuck like this for hours.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 4, 2026
Last year we had seen a massive… pic.twitter.com/izXGLqFMHs
प्रवाशांच्या नरकयातना
महामार्गावर अडकलेल्या लहान मुलांच्या अन्नासाठी पालकांची वणवण सुरू आहे. पिण्याच्या पाण्याचा साठा संपल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. घाटात अडकलेल्या महिलांना प्रसाधनगृहांची सोय नसल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. एसी आणि लाईट्स सुरू ठेवल्यामुळे अनेक गाड्यांमधील इंधन संपले असून, आता त्या गाड्या धक्का मारून बाजूला करण्याची वेळ आली आहे. पोलीस मोटरसायकलने वाट काढत मदत पोहोचवत आहेत. परंतू, वाहनांची आणि प्रवाशांची संख्या पाहता ती कुचकामीच ठरत आहे. मोटरसायकलवरून काय आणि किती गोष्टी पुरविणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. एकंदरीतच एक्स्प्रेवे वरील भयान अनुभव काल आणि आज हजारो वाहनधारकांनी घेतला आहे. दोन्ही बाजुला ४०-५० किमीपर्यंत रांगा पहायला मिळाल्या होत्या एवढे भयान ट्रॅफिक जाम पहिल्यांदाच भारतात अनुभवायला मिळाले आहे.