“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:16 IST2025-06-18T16:10:17+5:302025-06-18T16:16:44+5:30
MP Sunetra Ajit Pawar News: अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अन् आपणही आषाढी एकादशीला पांडुरंगाची पूजा करावी आणि, अशी इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला होता.

“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
MP Sunetra Ajit Pawar News: देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री म्हणून आषाढी एकादशीला शेवटची शासकीय पूजा केली होती ती २०१९ मध्ये. आता पाच वर्षांनंतर येत्या ६ जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री म्हणून ते सपत्नीक ही महापूजा करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेसाठी सपत्नीक यावे, असे निमंत्रण मंदिर समितीतर्फे फडणवीस यांना वर्षा शासकीय निवासस्थानी देण्यात आले. यातच जोरदार पाऊस झाल्याने अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी सुरू झाला. या सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याबाबत पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला.
अजित पवार आतापर्यंत अनेकवेळे उपमुख्यंत्रिपदी बसलेले आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मात्र अद्याप मिळालेली नाही. यावरून अजित पवार गटातील नेते, अजित पवार यांचे समर्थक अनेकदा भाष्य करत असतात. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत असतात. एका कार्यक्रमात बोलताना खुद्द अजित पवार यांनीही यावर भाष्य केले होते. मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटते की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण कुठे जमते, असे अजित पवार म्हणाले होते. आता खासदार सुनेत्रा पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील
तुम्हीदेखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न खासदार सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, आपण नेमही चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. पण शेवटी काय द्यायचे आणि काय द्यायचे नाही हे देवाच्या हातात असते. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील, असे सूचक विधान सुनेत्रा पवार यांनी केले.
दरम्यान, आषाढीवारीसाठी मंगळवारी सांयकाळीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. त्यामुळे इंद्रायणी हरीभजन आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाली होती. इंद्रायणीतीरी टाळ-मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरूणराजाचा अभिषेक होऊनी, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती. अशी अपूर्व अनुभूती देहूनगरीत येत आहे. आषाढी वारीमुळे वारकरी वर्गात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण होते.