“…तर कोश्यारींना चांगलाच चोप दिला असता”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार, नेते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:23 IST2026-02-12T14:20:06+5:302026-02-12T14:23:58+5:30
MNS Sandeep Deshpande Replied Bhagat Singh Koshyari: ते काय आम्हाला अक्कल शिकवणार, ते ठाकरेंना सांगतात की, मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरत आहे? अशी विचारणा करण्यात आली आहे.

“…तर कोश्यारींना चांगलाच चोप दिला असता”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार, नेते संतापले
MNS Sandeep Deshpande Replied Bhagat Singh Koshyari: संघासोबत जोडले जाणारे लोक हे पंतप्रधान मोदींना घाबरलेले नाहीत. राज ठाकरे यांचा खूप आदर करतो. पण ते पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरले आहेत असे मला वाटते. त्यांनी घाबरू नये. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या जवळ जायला हवे, त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत. पंतप्रधान मोदींना घाबरू नका असे त्यांना सांगणार आहे. महाराष्ट्रातले आहात त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. घाबरायचे असेल तर चुकीच्या कामांसाठी घाबरा, अशी टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरेंना उद्देशून केली होती. याला मनसे नेत्यांनी उत्तर दिले आहे.
भगतसिंह कोश्यारी यांच्या टीकेला संजय राऊतांनीही तीव्र शब्दांत उत्तर दिले. त्यांना नीट धोतर नेसता येत नाही, ते काय आम्हाला अक्कल शिकवतात. स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही, ते ठाकरेंना सांगतात की, मोदींना घाबरू नका. मोदींना कोण घाबरत आहे? तुमच्या हातात सत्ता आणि एजन्सी आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगत आहात. पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग इथे महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा. हा एक नंबरचा लफंगा माणूस आहे, या शब्दांत संजय राऊतांनी टीका केली.
…तर कोश्यारींना चांगलाच चोप दिला असता
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. आज क्रांतिकारक भगत सिंग असते, तर या कोश्यारींना खूप चोप दिला असता. त्या कोश्यारीने पहिले नाव बदलावे, अशी आम्ही मागणी करतो. तसेच चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे की, उद्धवसेनेच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा मोठा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका विशेष कार्यक्रमाची सध्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी या उपस्थितीवर सडकून टीका केली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका भ्रमात राहू नये. कार्यक्रमाला आलेली ही मंडळी तुमच्या विचारांवर प्रेम आहे म्हणून आलेली नव्हती. ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी यंत्रणांच्या धाकामुळे आणि भीतीपोटी तिथे बसली होती, असे राज ठाकरे म्हणाले होते.