सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:47 IST2025-06-05T15:45:24+5:302025-06-05T15:47:36+5:30
BJP Chandrashekhar Bawankule: भाजपा आमदार सीमा हिरे यांचे मत वेगळे असले तरी समज, गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
BJP Chandrashekhar Bawankule: उद्धवसेनेतील नाराजीमुळे सुधाकर बडगुजर यांच्यासह १२ माजी नगरसेवक पक्ष सोडणार असल्याच्या चर्चावर मात करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद बोलविली खरी; मात्र, याचवेळी नाट्यमय घटना घडली. पत्रकार परिषदेदरम्यान खासदार संजय राऊत यांनी दत्ता गायकवाड यांना फोन करून बडगुजर यांची हकालपट्टी केली असल्याचे सांगितले. यानंतर दत्ता गायकवाड यांनी तेथेच हकालपट्टीचा निर्णय जाहीर केला. यानंतर सुधाकर बडगुजर भाजपामध्ये जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यासंदर्भात भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत सूचक संकेत दिले आहेत.
उद्धवसेनेत विविध पदे भूषविलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ते भाजपात जाणार की शिंदेसेनेत, अशी चर्चा असतानाच या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. तब्बल १७ गुन्हे दाखल असणाऱ्या बडगुजर यांनी भाजपा प्रवेशाचा विचारही करू नये, असे भाजपा आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. तर, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी बडगुजर यांना प्रवेश देण्यास विरोध असल्याचे जाहीर केले. परंतु, भाजपा पक्षातूनच सुधाकर बडगुजर यांना घेण्यास विरोध केला जात असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपामध्ये ज्याला यायचे आहे त्याला या पक्षाचे दरवाजे खुले
सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून झालेली हकालपट्टी, भाजपा प्रवेशाची चर्चा अन् पक्षातून होत असलेला अंतर्गत विरोध यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना, भाजपामध्ये ज्याला यायचे आहे त्याला या पक्षाचे दरवाजे खुले आहेत. भाजपा आमदार सीमा हिरे यांचे मत वेगळे आहे, त्यांनी आताच त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. समज, गैरसमज दूर व्हायला वेळ लागतो. पुढची भूमिका गिरीश महाजन घेतील पण आता अजून याबाबत काही निर्णय झाला नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात निवडणुका लागतील म्हणजे दीड महिन्या आधी तयारीला सुरुवात असते, असे सूतोवाचही बावनकुळे यांनी केले. तसेच महायुती सरकारने ठरवले आहे की निवडणुका महायुती म्हणून होतील. एखाद्या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून बघू. परंतु, वितुष्ट निर्माण होईल असे होणार नाही, असे बावनकुळे यांनी नमूद केले.