VIDEO : महाविकास आघाडी म्हणजे 'अमर अकबर अँथनी' : पुण्यात रावसाहेब दानवेंचा जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 17:58 IST2020-10-06T14:45:51+5:302020-10-06T17:58:17+5:30
आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. परंतू,तेच जर एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार ?

VIDEO : महाविकास आघाडी म्हणजे 'अमर अकबर अँथनी' : पुण्यात रावसाहेब दानवेंचा जोरदार टोला
पुणे : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येत राज्यात स्थापन केलेले महाविकास आघाडी म्हणजे अमर अकबर अँथनीचे सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. परंतू,तेच जर एकमेकांच्या पायात पाय घालून पडले तर आम्ही काय करणार ? असा जोरदार टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, सहा वर्षांपासून काँग्रेस आणि मित्र पक्षांना लोकांसमोर जाण्यासाठी कुठलाच मुद्दा नव्हता. आपली मलिन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे. मोदी आणि तोमर यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचा माल किमान किमतीला खरेदी करण्यात येईल असे जाहीर केले आहे. असे असताना काँग्रेसने पंजाब हरयाणामध्ये आंदोलन करत आहे. काँग्रेसने मिनिमम सपोर्ट प्राईस ने खरेदीचा उल्लेख विधेयकमध्ये करा असं म्हणतंय, परंतु काँग्रसने देखील तसे केले नव्हते. मिनिमम सपोर्ट प्राईस हे मोदी सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांना सरकारने मार्केटमधून मुक्त केले आहे. आम्ही व्यापाऱ्यांचे वर्चस्व कमी करून स्पर्धा निर्माण केली. मार्केट कमिटीच्या बाहेर देखील एखाद व्यापारी शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकतो. शेतकऱ्यांना आम्ही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मार्केट कमिटीध्ये शेतकऱ्याला माल परत न्यावा लागत होता आता असं होणार नाही. मार्केट कमिटी, सरकार खरेदी बंद होणार नाही.
तसेच १ लाख कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये केली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या 90 टक्के शिफारसी आम्ही लागू केल्या. कृषी विधेयकांमुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहे. कोल्ड स्टोरेज मुळे शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी थांबणार आहे. शेतकऱ्याचा उत्पादन डबल करण्याच्या धोरणाच्या दिशेने ही पावलं आहेत. काँग्रेसचा कृषी विधेयकांबाबतचा प्रचार खोटा आहे. अकाली दल आमचा जुना मित्र परंतु पंजाब मध्ये काँग्रेसने हे बिल पंजाब मध्ये आणायचे असे जाहीरनाम्यात सांगितले होते, परंतु त्या बिलाला अकाली दलाने तिकडे विरोध केला होता. आम्हाला विरोधकाची भीती वाटत नाही. अपप्रचाराला विरोध करण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. या बिळासाठी कमिटी नेमली होती. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा होते. त्यांच्या शिफारसीवरून केले आहे. सुशांत सिंग प्रकरणात भाजपाची प्रतिमा मलीन झालेली नाही. त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यावर अधिक बोलणार नाही.