Maharashtra Rain Alert IMD: थबकलेला मान्सून सक्रीय झाल्यानंतर राज्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. कोकण, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून, इतर भागातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. कोकण, मुंबई आणि पुणे, सातारा, कोल्हापूर घाट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, पुढील दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१९ आणि २० जून रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
वाचा >>वरळी, बीकेसी मेट्रो स्थानकात गळती थांबेना!
पालघर,ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईलाही सतर्कतेचा इशारा
मुंबईत १९ जून रोजी पावसाचा जोर कमी राहणार असला, तरी २० जून रोजी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईला २० जून रोजी सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. मुंबईतील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकणात पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार आहे. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिंधुदुर्गला यलो अलर्ट दिला गेला आहे.
मराठवाडा, विदर्भात हवामान कसे असेल?
आज (१९ जून) आणि उद्या (२० जून) मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत मुसळधार पाऊस होऊ शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. २० जून रोजी विदर्भात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे.