महाराष्ट्रानं नाकारलं, आता बिहारची जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल, भाजपचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:04 IST2025-06-07T16:02:44+5:302025-06-07T16:04:33+5:30
Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रानं नाकारलं, आता बिहारची जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल, भाजपचा राहुल गांधींना टोला
लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केले. या निवडणुकीत महाराष्ट्रात मॅच फिक्सिंग झाले. आता बिहार आणि इतर राज्यांमध्येही असाच प्रकार घडणार, असे राहुल गांधी म्हणाले. यावर बोलताना महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.
बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधींनी निवडक आकडे वाचून देशाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करणे थांबवावे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील लोकांनी तुम्हाला नाकारले. आता बिहारमधील जनताही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल, या भितीपोटी राहुल गांधी एकदम गडबडून गेले आहेत.
"महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे. पुढील निवडणुकीतही हा विश्वास अतूट राहील. वारंवार खोटे बोलून तुम्ही राज्यातील जनतेच्या जनादेशाचा अपमान करत आहात. जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही", असे बावनकुळे म्हणाले.
"एप्रिल २००९ ला लोकसभा निवडणुकीत ७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले होते, तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? असे प्रत्युत्तर राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदार वाढीवर काँग्रेसतर्फे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर आकड्यांनिशी प्रत्युत्तर दिले.
"२००४, २००९ ला काँग्रेस जिंकली तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत. आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात", अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.