Maharashtra Government : संजय राऊतांचं फडणवीस-अजितदादांच्या सरकारवर नवं ट्विट, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 08:01 IST2019-11-24T07:57:41+5:302019-11-24T08:01:11+5:30
राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी काल बातमी आली आणि महाराष्ट्राच्या एकच खळबळ उडाली.

Maharashtra Government : संजय राऊतांचं फडणवीस-अजितदादांच्या सरकारवर नवं ट्विट, म्हणाले...
मुंबईः राज्याला राजकारणाला कलाटणी देणारी काल बातमी आली आणि महाराष्ट्राच्या एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वळण लागलं. त्यानंतर शरद पवारांनी अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी महाविकास आघाडीच्या संभाव्य सरकारला तिलांजली देण्याचाच प्रकार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अजित पवारांजवळ असलेलं 54 आमदारांच्या सह्याचं पत्र हे फसवणूक करून राज्यपालांना सादर केल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं अजित पवारांना पक्षाच्या गटनेतेपदावरूनही हटवलं आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार अशी गर्जना करणाऱ्या संजय राऊतांना तोंडघशी पडावं लागलं. संजय राऊतांनी आता या सरकारला अपघाती सरकार असं म्हटलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 24, 2019
या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथ ग्रहण प्रक्रियेला संजय राऊतांनी accidental शपथग्रहण!, असं संबोधलं आहे. तत्पूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊनही अजित पवारांवर आसूड ओढले होते. भाजपाने सत्ता आणि पैशांच्या जोरावर एका रात्रीत चित्र बदलले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. या घडामोडींमागे केवळ अजित पवारच आहे. शरद पवार यांचा यात कोणताही हात नाही, असं संजय राऊत म्हणाले होते. शुक्रवारी रात्री 9पर्यंत अजित पवार आमच्यासोबत चर्चा करत होते. मात्र, ते नजरेला नजर भिडवून बोलत नव्हते. जो व्यक्ती पाप करणार असतो, तोच नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यानंतर ते अचानक गायब झाले. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.
रात्रीच्या अंधारात राष्ट्रपती भवन खोलून त्यांनी राष्ट्रपती राजवट हटवली. मोदींच्या राजवटीत हे सारे होत असल्याचे आश्चर्य वाटते. कितीही चोरी लबाडी करा पण हिंमत असेल तर 30 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करून दाखवा. आज सकाळी अजित पवारांसोबत गेलेल्या आठ आमदारांपैकी पाच परत आले आहेत. त्या आमदारांचे अपहरण झाले होते ,असेच म्हणावे लागेल, असंही राऊत म्हणाले होते.