"कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त’’, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:25 IST2026-03-12T17:53:59+5:302026-03-12T18:25:24+5:30
Maharashtra Assembly Budget Session 2026: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.

"कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त’’, काँग्रेसची टीका
मुंबई - महायुती सरकारने अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले ज्या शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांच्या वर आहे, त्यांना लाभ कसा मिळणार? आधी त्यांनी वरची रक्कम भरावी आणि मग तुम्ही २ लाख देणार का? सरकारने ७/१२ कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? शेतकरी कर्जमाफीचे नेमके निकष काय आहेत,याची स्पष्टता आली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची मागणी होती, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कोणताही उल्लेख नाही. सरकारने हा बोनस जाहीर करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केला. तसेच धान खरेदीचा कोटा संपल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. असून मदत मिळालेली नाही. त्यामुळे हा कोटा वाढवून देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.
एकीकडे सरकार डबल इंजिन सरकार म्हणते पण अतिवृष्टीनंतर केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळालेली नाही.केंद्राच्या पथकाने दोन वेळा पाहणी केली.राहू सरकारने नोव्हेंबर महिन्यात प्रस्ताव पाठवला होता पण अजूनही हा निधी मिळालेला केंद्राचे पथक दोनदा महाराष्ट्रात येऊन गेले. केंद्र सरकार गुजरातला तात्काळ मदत पाठवते पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.
अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमिनींची, ढासलेल्या विहिरी यांची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. राज्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरीही सरकार ५०० कोटी खर्च करून बीकेसीमध्ये 'एआय कृषी महोत्सवा'चे इव्हेंट करण्यात मग्न आहे, यातून काय साध्य झाले? तापी खोऱ्यातील उपसा सिंचन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. कागदोपत्री चुकीची लाभक्षेत्रे दाखवून निधी लाटला जात आहे. विदर्भाचा लाभ दुसरीकडेच दाखवून कोण लोणी खात आहे? हे लाडके कंत्राटदार नेमके कोणाचे आहेत? असा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून पोलीस भरतीतही अनियमितता होत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून, अपात्र तरुणांना तोंडी परीक्षेत जास्त गुण दिल्याचे आरोप झालेले आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक झाली नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यात ७०० कोटींची वसुली करणाऱ्या आणि सीबीआयच्या रडारवर असलेल्या वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी पोस्टिंग का दिली जात आहे? अशा अधिकाऱ्यांना क्लिनचीट देऊन पाठीशी घालू नका,अस वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात ९१ लाखांच्या बनावट नोटा सापडणे ही राज्याच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे.या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.