अजित पवारांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय? वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 15:42 IST2026-01-28T15:40:38+5:302026-01-28T15:42:17+5:30
Ajit Pawar Plane Crash Reason: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय, ते ब्लॅक बॉक्सच्या तपासात स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय? वायुसेनेतील अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे
Ajit Pawar Plane Crash Reason: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी अजित पवार मुंबईहून बारामती येथे जात होते. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकाकूल झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते बारामतीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला, याबाबत प्रत्यक्षदर्शींनी काही खुलासे केले. विमान आधी सुरुवातीला गोल फिरले आणि नंतर हळूहळू खाली येऊ लागले. साधारण १०० फूट अंतरावर असताना विमानात काही स्फोट झाल्यासारखे आवाज ऐकू आले आणि विमान एकदम कोसळले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नेमके कारण काय हे ब्लॅक बॉक्सच्या तपासात स्पष्ट होईल. मात्र भारतीय वायुसेनेतील सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी याबाबत काही महत्त्वाच्या ३ गोष्टी समोर आणल्या आहेत.
भारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकाऱ्यांनी केले मोठे खुलासे
- एक म्हणजे बारामतीचे विमानतळ हे प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी उपयोगात आणले जाते. तिथे एक फ्लाइंग क्लब आहे, त्याच्या प्रशिक्षणासाठी वापरले जाते. बारामती विमानतळाची लांबी आणि रुंदी मानकांनुसार नाही. लांबी ५ हजार ५०० फूट आहे, तर रुंदी १०० फूट असेल. त्यामुळे असे म्हणता येईल की, छोट्या विमानतळांसाठी हे विमानतळ आहे.
- दुसरे म्हणजे तिथे हवामान खाते नाही. प्रत्येक विमानतळावर एक हवामान खाते असते. ज्यावेळी प्रत्यक्ष विमान उतरणार असते, तेव्हा हवामान कसे आहे आणि पुढील दोन तासांत किंवा तीन तासांत हवामान कसे राहणार आहे, याचा अंदाज हवामान खाते घेत असते.
- तिसरे आणि महत्त्वाचे म्हणजे एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाताना काही नेव्हिगेशन एड लागतात. त्यावरून मुंबई किंवा पुण्यातून निघाल्यावर बारामती कोणत्या दिशेला आहे, ते समजते. नेव्हिगेशनच्या माध्यमातून ते समजते. त्याचे बरेच प्रकार असतात. असे बारामतीला काहीच नाही.
दरम्यान, विमान उतरत असताना दृश्यमानता किती होती? बारामतीच्या विमानतळावर दृश्यमानता ही 4 किलोमीटरपर्यंत असणे गरजेचे असते. त्याशिवाय विमान उतरवणे खूप अवघड असते. त्यातच बारामती विमानतळावर लागणारी इन्ट्रुमेंट लँटिन्ग सिस्टीम उपकरणे लागली नाही. त्यामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसत होती का? कोणत्या परिस्थिती वैमानिक विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते, हे खूप महत्वाचे आहे. बारामती हे प्रशिक्षणार्थीसाठी तयार केलेले विमानतळ आहे. त्यामुळे येथील धावपट्टी आंतराष्ट्रीय मानकानुसार नाही. महत्त्वाचे म्हणजे परिस्थितीची माहिती दिल्यानंतर अजित पवार यांनी वैमानिकांना काय सूचना दिल्या होत्या का? या गोष्टी अपघाताला प्राथमिकदृष्टया जबाबाबदार राहू शकतात, असे सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितले.
अजित पवारांच्या विमानाचा असा झाला अपघात
- सकाळी ८ वाजून १० मिनिटे
मुंबईतून लियरजेट 45XR विमानाचं बारामतीकडे उड्डाण; अजित पवारांसह ५ जण विमानात
- सकाळी ८ वाजून ४० मिनिटे
विमान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ होते
- सकाळी ८ वाजून ४६ मिनिटे
विमान उतरवण्याचा पहिला प्रयत्न निष्फळ ठरला. दुसऱ्या प्रयत्नावेळी बारामतीतील गोजुबावी परिसरातील शेतात विमान कोसळले.