"धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान" काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:59 IST2023-03-18T17:58:42+5:302023-03-18T17:59:55+5:30
Congress Critisize BJP : बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

"धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान" काँग्रेसचा आरोप
मुंबई - जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ज्या धीरेंद्र शास्त्रीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला त्यावर राज्य सरकार कुठलीच कारवाई करत नाही उलट मीरा रोड येथील दोन दिवसाच्या कार्यक्रमाला परवानगी देते. काँग्रेस पक्षाने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. काही संघटनांनी सुध्दा या कार्यक्रमाला विरोध केला आहे, असे असतानाही भाजपाप्रणित सरकार या कार्यक्रमाला परवानगी देऊन ते मनुवादी आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
वारकरी संप्रदायाने कधीही जातपात पाहिली नाही. जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाला माननाऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले आहे की भाजपा वारकरीविरोधी आहे. जातीपातीच्यावर जाणून एकमेकांना माऊली म्हणणारा वारकरी संप्रदाय भाजपाला नको आहे, असे संत, महापुरुष भाजपाला नको आहेत. त्यांना मनुवाद करणारे, जातीभेद करणारे, धर्मावरून तेढ निर्माण करणारे बागेश्वर धामच्या भोंदूबाबासारखे लोक त्यांना हवे आहेत.