मुंबई - मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यातच मंत्री नितेश राणे यांनी जरांगे पाटलांना गंभीर चेतावणी दिली आहे. आमच्या देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, जरांगेंनी आरक्षणाची लढाई लढावी. मात्र ही लढाई लढताना आमच्या फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल, तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य आमच्यासारख्या ९६ कुळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असं त्यांनी इशारा दिला. मनोज जरांगे यांनी बीडच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्यानंतर भाजपा नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील, हा माझा सल्ला किंवा इशारा समजा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करत आहात. त्या छत्रपतींनी आपल्याला आयाबहिणींची इज्जत कशी करावी, सन्मान कसा करावा हे शिकवले आहे. मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीने महिलांचा अपमान करत आहात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला, हे कदापि सहन करणार नाही. एवढीच जर तुम्हाला खाज असेल तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढी वर्ष आरक्षण दिले नाही, त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही. यापुढे जर असे अपशब्द काढले तर तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर द्यायला कमी पडणार नाही असं आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. अनेक जिल्हे, तालुक्यात जाऊन मराठा समाजाच्या बैठका घेत आहेत. मराठा समाजाची ताकद मुंबईत दिसण्यासाठी आटापिटा करत आहेत. मुंबईकरांनी सांगावे, चूक सरकारची आहे का आमची? ५८ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. आता सरकारला काय पुरावा पाहिजे. आता प्रश्न आहे, आम्ही तुमचे का ऐकावे? आम्ही मुंबईत का येऊ नये? यांना वेळ द्यायचा तरी किती? आम्ही प्रत्येक वेळी वेळ दिला आहे. काय व्हायचे ते होऊ द्या, मी मुंबईमध्ये घुसणार. आम्ही कोणाचे आरक्षण मागत नाही, आमचे आम्हाला आरक्षण द्यावे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.