'त्या' बैठकीनंतर अजितदादांचा मला फोन आला होता; NCP विलीनीकरणावर सुनील तटकरेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:19 IST2026-02-04T12:16:29+5:302026-02-04T12:19:01+5:30

राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मुख्य मुद्दा आहे. मी वारंवार विचारतोय कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार आहे. पण दुर्दैवाने त्यावर कुणी बोलत नाही असं तटकरेंनी सांगितले.

I got a call from Ajit Pawar after 'Baramati' meeting; Sunil Tatkare big claim on NCP merger | 'त्या' बैठकीनंतर अजितदादांचा मला फोन आला होता; NCP विलीनीकरणावर सुनील तटकरेंचा मोठा दावा

'त्या' बैठकीनंतर अजितदादांचा मला फोन आला होता; NCP विलीनीकरणावर सुनील तटकरेंचा मोठा दावा

मुंबई - शपथविधीची घाई का झाली याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसं विलीनीकरणाची चर्चासुद्धा स्व. अजितदादांवर अंत्यविधी होण्यापूर्वी का कुणी सुरू केली, सतत मुलाखतींचा फेऱ्या का सुरू ठेवल्या त्यामागे कारणे काय होती? विलीनीकरण ही धोरणात्मक बाब आहे परंतु त्याचा उपमुख्यमंत्रिपदाचा, विधिमंडळ नेतेपदाचा कसा दुरान्वये संबंध येतो हे मला राजकीय कुणी समजून सांगितले तर नक्कीच मी त्यावर भूमिका मांडेन. जो व्हिडिओ फिरवला जातोय, त्यानंतर अजितदादांचा मला फोन आला होता असं सांगत सुनील तटकरे यांनी विलीनीकरणावरून मोठा दावा केला.

सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मुख्य मुद्दा आहे. मी वारंवार विचारतोय कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार आहे. पण दुर्दैवाने त्यावर कुणी बोलत नाही. एकबाब म्हणजे ही चर्चा कुठल्या टप्प्यावर कोण सुरू करणार हा प्रश्न पुढे आहे. मी ८-१० महिन्यांपासून सतत म्हणत आलोय, आम्ही भाजपासोबत आहोत. एनडीएत आहोत हे ज्यांना मान्य असेल तेच आमच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा करू शकतात नाहीतर चर्चा करण्याचे कारण नाही. जर हे मान्य असेल तर त्याबाबत पुढे चर्चा कोण, कधी करणार हे आता सांगता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुणे, पिंपरी महापालिका एकत्रित लढण्याचा निर्णय झाला त्याची माहिती आम्हाला दादांनी दिली. त्यानंतर वेगवेगळ्या वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत विलीनीकरणाबाबत अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडली. अजितदादांची आणि माझी भेट झाली. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला एकत्रित पुढे जायचे आहे तसं बोलणे झाले होते. दुसऱ्या दिवशी बारामतीत कृषी प्रदर्शन होते. त्यावेळी अजितदादांसोबत बैठकीचा व्हिडिओ आता फिरतोय. परंतु त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अजित दादांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीत बहुतांश ठिकाणी एकाच चिन्हावर लढवली जाईल. त्यावेळी दादांनी मला फोन केला. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी निवडणूक होतेय तिथे शक्य असेल तिथे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, आपल्या सहकाऱ्यांनी तशी भूमिका घ्यावी असं दादांनी मला सांगितले होते असं त्यांनी स्पष्ट केले. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

मी विरोध करण्याचं कारण नाही...

विलीनीकरणाला माझा विरोध आहे की नाही हा मुद्दा बिल्कुल गौण आहे. दादांचा विश्वासू सहकारी म्हणून गेली ४० वर्षे मी काम करत आलोय. मी दादांचा विश्वासू सहकारी असल्याने अनेक वेळेला माझ्यावर कायम आक्षेप घेतले गेलेत. उद्या माझ्यावर बोलण्याची वेळ येईल तेव्हा मी यावर जरूर बोलेन. पण दादांचा निर्णय जे मी मागील ३० वर्षापासून मानत आलो तसेच विलिनीकरणाचा निर्णय असता तर माझा त्याला विरोध असण्याचे कारण नव्हते. दादांना हा विश्वास होता, मी जे बोलेल ते सुनील तटकरे मान्य करेल. दादांची आणि माझी वेगवेगळ्या विषयावर चर्चा व्हायची. त्यावेळी मी माझे मत मांडायचो. पण नेता म्हणून दादांनी निर्णय सांगितला तर त्यावर अंमलबजावणी करणे या भूमिकेतून सुनील तटकरे दादांच्या कार्यपद्धतीत काम करत आला आहे असंही तटकरेंनी खुलासा केला.

विलीनीकरणाबाबत भाजपाशी चर्चा आवश्यक

राष्ट्रवादी काँग्रेस हा एनडीएचा घटक पक्ष आहे. एनडीए म्हणजे भाजपा प्रणित मित्रपक्ष हे स्पष्ट आहे. यूपीए म्हणजे कोण तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष... जेव्हा एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा आमच्या भूमिकेला भाजपाने होकार दर्शवला. त्यानंतर आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झालो. विधानसभा एकत्र लढवल्या. अशावेळी विलीनीकरणाबाबत भाजपाशी चर्चा करणे स्वाभाविक आहे. जेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. त्यावेळी यूपीएमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस होती. शिवसेना नव्हती. २०१९ साली पर्यायाने शिवसेनेला यूपीएत समाविष्ट करण्यासाठी सोनिया गांधी यांची परवानगी मागितली ना...कारण यूपीएच्या त्या महत्त्वाच्या घटक आहेत. त्यामुळे ज्या पक्षाच्या नेतृत्वात राजकीय आघाडी किंवा युतीची वाटचाल होते तेव्हा त्या मित्रपक्षांशी चर्चा करणे स्वाभाविक आहे असं सांगत राष्ट्रवादी विलीनीकरणावर भाजपाशी चर्चा करण्यावर तटकरेंनी भर दिला. 

अजितदादांची ती इच्छा पूर्ण केली नाही, म्हणून...

२०१९ मध्ये भाजपा-राष्ट्रवादीचे सरकार बनावे हीदेखील अजितदादांची इच्छा होती. दादांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. २०२२ मध्येही भाजपा-राष्ट्रवादी सरकार बनले पाहिजे. २०२३ मध्येही तीच इच्छा होती. त्यावेळी अजितदादांची इच्छा पक्षात स्वीकारली नाही. त्यामुळेच अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षात २ भाग झाले. दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत काही सहकाऱ्यांच्या मनात वेगळी भूमिका होती. त्यामुळेच दोन वेगवेगळे पक्ष झाले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आम्ही वेगळे लढलो. विधानसभेलाही आम्ही वेगळे लढलो होतो. हा पक्ष गेल्या ३ वर्षापासून प्रचंड मेहनतीने, इच्छाशक्तीने, अजितदादांच्या जनसंपर्काने आम्ही स्वतंत्र लढून अभूतपूर्व यश २०२४ च्या विधानसभेला मिळवले. एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय जनतेने मान्य केला. त्यामुळे ५९ जागांपैकी ४१ जागांवर आमचा विजय झाला. राजकीय निर्णयाला जनमान्यता मिळाली असं सांगत सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील नेत्यांवर टीका केली. राष्ट्रवादी विलीनीकरण ही अजितदादांची अंतिम इच्छा आहे असं शरद पवार गटातील नेते सातत्याने सांगत आहेत. 

राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच 

सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचे काम आम्ही सामूहिक नेतृत्वातून करतो आहोत. दादांनी जेव्हा एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तोही आम्ही सामूहिकपणे घेतला होता. आताही दिल्लीत प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत मी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेत नाही असं स्पष्ट सांगितले. आमच्यादृष्टीकोनातून प्राधान्याने विधिमंडळ नेतेपदाची जी जागा रिक्त होती ती भरणे होते. अजितदादांच्या निधनानंतर विधिमंडळ पक्षाची वाटचाल कशी असावी यासाठी आम्ही चर्चा करून निर्णय घेतला. त्यामुळे कुणाला काय वाटते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष आणि भविष्यातील पक्षाची वाटचाल यादृष्टीने आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय असं आम्हाला सगळ्यांना वाटते. आगामी काळात जनतेच्या भावना, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार-खासदारांच्या भावना जाणून घेत निश्चितपणे राष्ट्रीय अध्यक्षाबाबत लवकरात लवकर योग्य वेळी निर्णय घेऊ असंही सुनील तटकरेंनी स्पष्ट केले. 
 

 

Web Title : बैठक के बाद अजित दादा का फोन आया: एनसीपी विलय पर सुनील तटकरे का बड़ा दावा।

Web Summary : सुनील तटकरे का दावा है कि अजित दादा ने एक वीडियो प्रसारित होने के बाद उन्हें फोन किया, जिसमें एनसीपी के विलय पर चर्चा हुई। उन्होंने विलय वार्ता में भाजपा की भागीदारी पर जोर दिया और भाजपा-एनसीपी सरकार के लिए अजित दादा की इच्छा का खुलासा किया, जिससे पार्टी में विभाजन हो गया। राष्ट्रीय अध्यक्ष का फैसला जल्द।

Web Title : Ajit Dada called after meeting: Sunil Tatkare's big claim on NCP merger.

Web Summary : Sunil Tatkare claims Ajit Dada called him after a circulating video, discussing NCP merger. He emphasizes BJP's involvement in merger talks and reveals Ajit Dada's wish for a BJP-NCP government, leading to a split within the party. National President decision soon.