अपघात झालाच कसा?; विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिंकीच्या कुटुंबीयांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 11:02 IST2026-01-29T11:01:43+5:302026-01-29T11:02:03+5:30
Ajit Pawar Plane Crash: विमानाला झालेल्या दुर्घटनेत 'फ्लाईट अटेंडंट' पिंकी हिचाही समावेश असून, या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तालुक्यातील भैंसा हे पिंकीचे मूळ गाव. गेल्या पाच वर्षांपासून ती विमानवाहतूक क्षेत्रात कार्यरत होती.

अपघात झालाच कसा?; विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिंकीच्या कुटुंबीयांचा सवाल
मुंबई - विमानाला झालेल्या दुर्घटनेत 'फ्लाईट अटेंडंट' पिंकी हिचाही समावेश असून, या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तालुक्यातील भैंसा हे पिंकीचे मूळ गाव. गेल्या पाच वर्षांपासून ती विमानवाहतूक क्षेत्रात कार्यरत होती. वडील शिवकुमार यांनी सांगितले की, पिंकीने एअर इंडिया आणि इंडिगो या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले आहे. दोन वर्षांपासून ती व्हीएसआर एव्हिएशन (व्हीआयपी चार्टर्ड सेवा) या कंपनीत कार्यरत होती. तिचे संपूर्ण कुटुंब वरळीमध्ये राहत असून, ती तिच्या पतीसोबत कळव्याला राहत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पिंकी यापूर्वी पाचवेळा अजित पवार यांच्यासोबत बारामतीचा प्रवास करून आली होती. एकदा तिने मजेत अजित पवार यांना, "दादा, तुम्ही इतके फिरता पण कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाही," असे म्हटले होते. त्यावर अजित पवार हसले होते, अशी आठवण तिच्या वडिलांनी सांगितली. पिंकीने अत्यंत मेहनतीने आपले करिअर घडवले होते. ती दररोज आई-वडिलांना फोन करत असे. मात्र, अपघाताच्या दिवशी एकही फोन न आल्याने कुटुंबीय अस्वस्थ झाले होते, असे तिची आई माया माळी यांनी सांगितले.
'इतक्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या उड्डाण सेवेत असा अपघात कसा झाला?' असा प्रश्न उपस्थित करत माया माळी यांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पिंकीचे पार्थिव मूळ गावी आणून संपूर्ण सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.