सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; सतेज पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 12:06 IST2026-03-07T12:05:44+5:302026-03-07T12:06:23+5:30
आर्थिक गैरव्यवहारांच्या तुलनेत सायबर आर्थिक गुन्ह्यांमध्ये तीनपट वाढ झाल्यामुळे बँक खातेधारक चिंताग्रस्त

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; सतेज पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
कोल्हापूर : बॅंकिग क्षेत्रात वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही किंवा उपाययोजना केली आहे असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनी युक्त अशा उपाययोजनांचा समावेश असलेला महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे सांगितले.
राज्यात बँकिग क्षेत्रातील आर्थिक गैरव्यवहारांमुळे सामान्य खातेधारक चिंताग्रस्त झाले असून यामुळे अनेक खातेधारकांचे पैसे बँकामध्ये अडकले आहेत. सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तुलनेत सायबर आर्थिक गुन्ह्यांमध्ये तीनपट वाढ झाल्यामुळे बँक खातेधारक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात वाढत असलेले सायबर गुन्हे रोखण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य शासनाने सायबर फसवणुकीला बळी पडणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि संसाधनांनी युक्त अशा उपाय योजनांचा समावेश असलेला महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचं सांगितले.