जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:07 IST2025-07-25T15:01:54+5:302025-07-25T15:07:26+5:30
Congress Prithviraj Chavan News: कुठेतरी काहीतरी बिनसले आहे. अंतर्गत वाद निर्माण झाला. राजीनामा जबरदस्ती घेतला गेला. त्यात आता काय घडले, कशामुळे घडले, ते हळूहळू बाहेर निघेल, असे म्हटले गेले आहे.

जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
Congress Prithviraj Chavan News: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला. तो स्वीकारण्यात आला. यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची प्रतिक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत सरकारवर टीका करताना, दाल में कुछ काला हैं, असे म्हटले आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याबद्दल जे प्रकरण झाले, त्याला मी राजीनामा म्हणणार नाही. राजीनामा ही एक औपचारिकता होती, पण त्यांना काढून टाकले गेले. हे स्पष्ट आहे की, कुठेतरी काहीतरी बिनसले आहे. काहीतरी अंतर्गत वाद निर्माण झाला. त्यांना अत्यंत दुर्दैवी पद्धतीने त्यांना काढले गेले. मूळातच त्या व्यक्तीला उपराष्ट्रपती यासारख्या सर्वोच्च पदावर बसवणे पूर्ण चुकीचे होते. फक्त राजकीय हेतूने त्यांना पदावर बसवण्यात आले. शेवटी ते त्यांच्याच अंगलट आल्यामुळे त्यांना काढले. एका संविधानिक पदावर बसलेली ती व्यक्ती होती. त्यांना अशा प्रकारे वागवायला नको होते. राजीनामा जबरदस्ती घेतला गेला आहे. त्यामुळे त्यात आता काय घडले, कशामुळे घडले, ते हळूहळू बाहेर निघेल, या शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला.
कशामुळे झाले, काय झाले, हळूहळू ते आपल्याला कळेल
मला असे वाटते की, दाल में कुछ काला हैं किंवा ऑल इज नॉट वेल इन दिल्ली. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाची ७५ वर्षे होत आहेत. याबाबतही दिल्लीत अंतर्गत चर्चा सुरू आहे. परंतु, दिल्लीत उपराष्ट्रपतीपदाबाबत जे काही घडले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. त्यात अनेक तर्क-वितर्क आहेत. कशामुळे झाले, काय झाले, हळूहळू ते आपल्याला कळेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, निवडणूक आयोगाने नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर त्यासाठी उमेदवार कोण याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार पुढील आठवड्यात वेगाने हालचाली करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा पूर्ण झाल्यानंतर आणि काही वादग्रस्त मुद्द्यांवरील धुरळा खाली बसल्यानंतर अधिक सुस्पष्टता येणार आहे. भाजपा आपल्याच पक्षातील व्यक्तीला उपराष्ट्रपती पदावर विराजमान करण्यास प्राधान्य देईल. त्यासाठी तो सहमती निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. भाजपाला स्वबळावर बहुमत मिळविता न आल्याने जनता दल (यू) व तेलुगू देसम पक्ष या दोन घटक पक्षांनाही रुचेल, असा उमेदवार देण्याचा भाजपा प्रयत्न करणार आहे.