Maharashtra Politics: “भारतीय जुमला पार्टीचे पाप जनतेपर्यंत पोहोचवा, मोदी सरकारने देशाचे वैभव रसातळाला नेले”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:17 PM2023-01-23T19:17:53+5:302023-01-23T19:18:35+5:30
Maharashtra News: जनतेचा विश्वासच पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
![congress nana patole criticised bjp and pm narendra modi govt over various issue | Maharashtra Politics: “भारतीय जुमला पार्टीचे पाप जनतेपर्यंत पोहोचवा, मोदी सरकारने देशाचे वैभव रसातळाला नेले” congress nana patole criticised bjp and pm narendra modi govt over various issue | Maharashtra Politics: “भारतीय जुमला पार्टीचे पाप जनतेपर्यंत पोहोचवा, मोदी सरकारने देशाचे वैभव रसातळाला नेले”](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/pm-n-modi_202108667179.jpg)
Maharashtra Politics: “भारतीय जुमला पार्टीचे पाप जनतेपर्यंत पोहोचवा, मोदी सरकारने देशाचे वैभव रसातळाला नेले”
Maharashtra Politics: देश स्वतंत्र झाला तेव्हा जाताना इंग्रजांनी देश लुटला होता पण काँग्रेसने ७० वर्षात हा देश उभा केला. मागील ८ वर्षांपासून भाजपाचे सरकार केंद्रात असून त्यांनी ७० वर्षात उभे केलेले सर्व वैभव रसातळाला मिळवले. २०१४ साली सत्तेत येताना जनतेला भरमसाठ आश्वासने दिले पण सत्तेत येताच त्यांना त्याचा विसर पडला आणि ती तर निवडणुकीतील जुमले होते असे भाजपाने म्हटले. भाजपाने जनतेचा विश्वासघात केला. भारतीय जुमला पार्टीचे हे पाप जनतेपर्यंत पोहचवायचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानात भाजपा सरकारवर एक आरोप पत्र जारी केले आहे. मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, रेशनवरील केरोसिन बंद केले. परदेशातून काळे धन आणू, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकू, वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करु अशी आश्वासने दिली होती प्रत्यक्षात रोजगार दिलेच नाहीत उलट या देशाला बेरोजगारांचा देश बनवले, शेतकऱ्यांना बरबाद केले. छोट्या व्यापाऱ्याला उद्ध्वस्त केले आणि मुठभर लोकच श्रीमंत होत गेले. आज देशातील २१ लोकांकडे तब्बल ७१ टक्के पैसा आहे, हा भारतीय पनता पक्षाने जनतेचा केलेला विश्वासघात आहे. हे सर्व जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. हाथ से हाथ जोडो अभियानातून घरा घरात जा व काँग्रेस विचार पोहोचवा व भाजपाचे पाप जनतेला कळू द्या, असे नाना पटोले म्हणाले.
जनतेचा विश्वासच पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळवून देईल
माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यावेळी म्हणाले की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानाची सुरुवात केली आहे. फुले वाड्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, येथूनच महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी सामाजिक समतेचा विषय मांडला व इतिहास घडवला. मावळत्या सुर्याला साक्षी ठेवून आपण बसलो आहेत व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करत आहोत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजी गांधी देशाच्या जनतेसाठी लढा देत आहेत. काँग्रेस पक्ष कधी सत्तेत असो किंवा नसो पण काँग्रेस शिवाय या देशात पर्याय नाही हा जनतेचा विश्वास आहे. काँग्रेसवरील जनतेचे हे प्रेम व विश्वासच पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"