काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 10:39 IST2020-06-18T10:37:49+5:302020-06-18T10:39:28+5:30
गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. गेल्या आठवड्यातील गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार
मुंबई : विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. गेल्या आठवड्यातील गुरुवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची मोट बांधताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांना खूप प्रयत्न करावे लागले होते. मात्र, अनेक बैठका, चर्चेनंतर त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले होते. मंत्रीमंडळ वाटपावरूनही बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे नेते नाराज आहेत.
विधान परिषदेच्या 9 जागांवरून काँग्रेस नाराज झाला होता. तिसरा उमेदवार देण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही होते. ९ जागांसाठी ही निवड़णूक होणार होती. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी ही निवडणूक महत्वाची होती. यामुळे काँग्रेसची मनधरणी करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली होती. यामुळे निवडणूक बिनविरोध झाली होती. आता पुन्हा राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागावरून काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. तसेच राज्य सरकारमध्ये नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची ओरड काँग्रेस नेते मारत आहेत.
विधान परिषदेच्या १२ जागांचे आणि महामंडळांच्या नियुक्त्या समान करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी गेल्या गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. आज काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हान यानी महाविकास आघाडीमध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे मान्य केले आहे. ''महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद असून आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यांच्याशी यावर चर्चा करण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे, असे अशोक चव्हान यांनी सांगितले. यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना वेळ दिला असून आज दुपारी दीड वाजता हे नेते ठाकरेंना भेटणार आहेत.
सामनामधून टीकास्त्र
काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये, असा इशारावजा सल्ला देण्यात आला आहे.
बैठकीत काय घ़डले?
काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक मुंबईत गुरुवारी झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्य नेतेही या बैठकीला हजर होते. मंत्रीपदाचे वाटप आमदारांच्या संख्येनुसार झाले असले तरी भविष्यातील सर्व वाटप समसमान असेल, असे याआधी अनेकदा ठरले होते. विधान परिषदेच्या जागा तिन्ही पक्षांनी समान वाटून घ्यायच्या, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता, असे असताना आता ५ जागा शिवसेनेला, ४ जागा राष्ट्रवादीला आणि ३ जागा काँग्रेसला, असा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जे ठरले होते त्याचे पालन झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगण्यात येईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द
India China Face Off: चीनच्या वर्मावरच बोट; केंद्र सरकार टेलिकॉम उपकरणांचे मोठे कंत्राट रद्द करणार
यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत
Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल