“मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही?”; काँग्रेस नेत्यांची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:46 IST2026-01-26T10:44:24+5:302026-01-26T10:46:38+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: मुंबईत बिहार भवन बांधण्याबरोबरच पाटण्यात महाराष्ट्र भवन बांधण्याचे जाहीर केले असते तर दोन राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान होत आहे असे दिसले असते, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

“मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही?”; काँग्रेस नेत्यांची भाजपावर टीका
Congress Harshwardhan Sapkal News: बिहार सरकारने दिल्लीनंतर आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याची घोषणा केली. मुंबईमधील एलिफिस्टन इस्टेट, मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात हे बिहार भवन बांधले जाणार असून, त्यासाठी ३१४ कोटी २० लाख रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. मुंबईतील बिहार भवनाच्या बांधणीला विरोध होऊ लागला आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपावर टीका केली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने मुंबईत बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धवसेना व मनसेने यावर आक्रमक भूमिका घेत त्यास विरोध केला आहे. मुंबईची अवस्था समजून घ्या. तुम्हाला जागा हवीच असेल, तर गौतम अदानींकडून बाजारभावाने ती विकत घ्या. सरकारकडून मोफत किंवा सवलतीच्या दरात जागा हवी असेल, तर आधी सांस्कृतिक देवाणघेवाण करा. महाराष्ट्रातील असंख्य लोकही बिहारला जातात, त्यांनाही तिथे राहण्याची सोय मिळायला हवी. मुंबईत जर जागा हवी असेल तर गौतम अदानींकडून बाजारभावाने घ्यावी, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.
मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही
भारतीय जनता पक्ष हा जात, धर्म, भाषा, प्रांत याचा राजकारणासाठी वापर करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी असे द्वेष पसरवण्याचे काम भाजप करत असते, त्याच मानसिकतेतून मुंबईत बिहार भवन बांधण्याचा घाट घातलेला दिसत आहे. मुंबईत बिहार भवन बांधण्याबरोबरच पाटण्यात महाराष्ट्र भवन बांधण्याचे त्यांनी जाहीर केले असते तर दोन राज्यात सांस्कृतिक आदान प्रदान होत आहे असे दिसले असते पण भाजपाला फक्त वाद निर्माण करायचे आहेत आणि त्यातूनच बिहार भवनचा मुद्दा पुढे आणला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यात योग्य समन्वय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.