नियमांचे उल्लंघन करून अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; कर्नाटकच्या कृतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:08 IST2025-06-16T13:08:11+5:302025-06-16T13:08:37+5:30

अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग

Concern in Sangli and Kolhapur districts as Almatti dam in Karnataka is filled to 52 percent in violation of rules | नियमांचे उल्लंघन करून अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; कर्नाटकच्या कृतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत चिंता

नियमांचे उल्लंघन करून अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; कर्नाटकच्या कृतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत चिंता

सांगली : अलमट्टी धरण जून महिन्यात ४७ टक्क्यांपर्यंत भरण्यास केंद्रीय जलआयोगाने परवानगी दिली आहे; पण कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्सून पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा ठेवून जलआयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी म्हणजे ५१९.६ मीटरपर्यंत पाणीसाठवण क्षमता आहे. या धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणीसाठा केला पाहिजे, याबद्दल केंद्रीय जलआयोगाने नियम ठरविले आहेत. त्यानुसार जूनअखेरपर्यंत ५७ टीएमसी म्हणजेच ५१३.६० मीटर म्हणजेच ४७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. असे असतानाही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दि. १५ जून रोजी धरणात ६४.०३ टीएमसी पाणीसाठा ठेवला असून, ५२ टक्के धरण भरले आहे. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जलआयोगाच्या नियमाला धरून नाही. 

सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नाही. येत्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अलमट्टी धरण ५२ टक्के भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग आहे. मान्सूनचा जोर वाढल्यानंतर येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन अलमट्टी धरणाचे अधिकारी कसे करणार आहेत, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय : चंद्रशेखर पाटाेळे

पावसाळा सुरू झाल्यापासून कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. आपल्या पाटबंधारे विभागाचे अधिकारीही तिथे नियुक्त केले आहेत. जून महिन्यात अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४७ टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे; पण त्यांनी त्यापेक्षा जास्त ठेवल्याबद्दल अलमट्टी येथील अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे. ते पाण्याचा विसर्ग वाढवतील, असा विश्वासही पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी व्यक्त केला.

अलमट्टी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय जलआयोगाच्या नियमांचे पालन केले नाही. ४७ टक्के पाणीसाठा ठेवण्याऐवजी ५२ टक्के पाणीसाठा ठेवला आहे. याबद्दल राज्य सरकारने कर्नाटक सरकारला नोटीस काढली पाहिजे. तसेच केंद्रीय जलआयोगाकडेही तक्रार केली पाहिजे. आमच्या सामाजिक संस्थेतर्फे केंद्रीय जलआयोगाकडे तक्रार करणार आहे. -सर्जेराव पाटील, निमंत्रक, कृष्णा महापूर नियंत्रण समिती

Web Title: Concern in Sangli and Kolhapur districts as Almatti dam in Karnataka is filled to 52 percent in violation of rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.