'योगेश कदम जे बोलले, त्याला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचत काय दिला सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:56 IST2025-02-28T13:46:53+5:302025-02-28T13:56:07+5:30

Yogesh kadam swargate case: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबद्दल केलेल्या एका विधानाने वाद उभा राहिला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. 

Chief Minister Devendra Fadnavis advises Yogesh Kadam, who made controversial statements | 'योगेश कदम जे बोलले, त्याला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचत काय दिला सल्ला?

'योगेश कदम जे बोलले, त्याला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचत काय दिला सल्ला?

Devendra fadnavis Yogesh Kadam News: स्वारगेट बलात्कार घटनेवर बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पीडितेकडून कोणताही विरोध झाला नसल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानाने वादाला तोंड फुटले आहे. या विधानाबद्दल भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना सल्ला दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील स्वारगेट येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल माहिती दिली.

'मंत्री संजय सावकारे असे म्हणतात की, ही घटना पुण्यातच नाही, तर देशभरात अशा घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की, तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली', असा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उपस्थित केला.

योगेश कदम, सावकारेंच्या विधानावर फडणवीसांचं उत्तर काय?

उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, योगेश कदम जे बोलले, त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यात माझा स्वतःचा हा समज आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की, हा गर्दी असणार भाग आहे. लोक होते. बस काही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती. पण, प्रतिकार होताना लोकांना लक्षात आला नाही. असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता."

"ते नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की, अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक संवेदनशीलपणे आपण बोलले पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. निश्चितपणे जे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील. अशा प्रकारच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी संवेदनशीलपणे बोललं पाहिजे, असा माझा सल्ला असेल", अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

योगेश कदमांचं ते विधान काय, ज्यामुळे निर्माण झाला वाद?

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरूवारी (२७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी बोलताना हे विधान केले होते. 

ते म्हणाले होते की, "विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो; दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती सगळ्यांना आहे. अशा वेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही वादविवाद, कुठलीही बळजबरी, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे. हाणामारी झाली आहे, असे काहीच घडलेले नाही. त्यामुळे आसपास असलेल्या सर्वसामान्यांदेखील ते कळले नाही", असे विधान कदम यांनी केले होते. 

कदमांकडून पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी टीका केली. या विधानाचे राजकीय वर्तुळात प्रतिसाद उमटले आहेत. 

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis advises Yogesh Kadam, who made controversial statements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.