छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 19:15 IST2024-12-19T19:14:34+5:302024-12-19T19:15:15+5:30
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.

छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी
छगन भुजबळांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, केली मोठी मागणी
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर जुन्या अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा देखील समावेश आहे.
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला, त्यानंतर ते चांगलेच आक्रमक झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती की मी मंत्रिमंडळात असावं, मात्र मला कोणी डावललं याचा शोध घ्यावा लागेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच, आपण मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे मला बक्षीस मिळाल्याचा टोला देखील छगन भुजबळ यांनी लगावला होता.
अशातच आता छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कांद्यावर लावण्यात आलेले 20 टक्क्यांचे निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. महिनाभरातील लासलगाव बाजार समितीतील कांद्याच्या दरात चांगलीच चढ-उतार होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.
महिनाभरात कांद्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे कांद्यावर लावण्यात आलेलं निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सध्याचा लाल कांदा नाशवंत आहे, त्यामुळे त्याची लवकरात लवकर विक्री करणे गरजेचे आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या 60 टक्के कांदा उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात होते. तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 60 टक्के कांदा हा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
कांदा हे ऐकमेव नगदी आणि जिव्हाळ्याचे पीक आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लासलगाव ही अशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इतर देशात कांद्याची निर्यात केली जाते. सध्या उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपल्यामुळे लाल कांदा बाजारात येत आहे. मात्र, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अत्यंत कमी दराने बाजारात कांद्याची विक्री सुरु आहे. सध्या कांद्याला 1600 रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत असल्याचे छगन भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.
आधीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसला आहे. अशातच आता उत्पादन खर्चापेक्षाही दर कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोट सहन करावा लागत आहे. नाशिकच्या कांद्याला परदेशात मोठी मागणी आहे. मात्र, सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावले आहे. त्याचा परिणाम थेट कांद्याच्या निर्यातीवर होत असल्याचे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे. याचबरोबर, लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ शेतकऱ्यांना विकावा लागत आहे. त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, त्यासाठी निर्यातीवरील असणारे 20 टक्के निर्यात शुल्क हटवावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी पत्रात केली आहे.