“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:43 IST2025-08-17T13:43:27+5:302025-08-17T13:43:27+5:30
Chhagan Bhujbal News: नाशिकचा पालकमंत्रीपदा मिळावे, अशी अप्रत्यक्ष इच्छाही छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली.

“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
Chhagan Bhujbal News: मी ध्वजारोहण करतोय तर वाईट वाटतंय का तुम्हाला. आता ध्वजारोहण करतोय, हळूहळू पुढे सरकतोय, असे सूचक विधान राज्याचे जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने पालकमंत्री पदावरील वाद पुन्हा वाढला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री सांगतील तो निर्णय मान्य असेल असे सांगितले.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. भाजपाचे नेते तथा जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, शिंदेसेनेचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हे प्रमुख दावेदार आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे
मला कल्पना नाही. त्यांना होऊ द्या, कुणालाही होऊ द्या. कारण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जी बैठक होते, त्या बैठकीला मी नसतो. मला असे वाटते की, जसे रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, तिथे आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतो. आमच्या लोकांना सांगेन की, सात आमदार सगळ्यात जास्त नाशिकमध्ये आहेत. त्यासाठी त्यांनी तेवढाच आग्रह धरावा. पालकमंत्री कोण होणार, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. सात आमदार एकाच पक्षाचे असतील, तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे, असे मला वाटते आणि माझे म्हणणे मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे मांडेन, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच पालकमंत्री पद मिळाले, तर इच्छुक नाही तर नाही. सर्व मंत्र्यांमध्ये २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टचे झेंडावंदन सगळ्यांत जास्त वेळा मी केले आहे. १९९१ पासून मी झेंडावंदन करत आहे. त्यामुळे मला त्याचे काही दुःख नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.
दरम्यान, पालकमंत्रिपदावर बोलताना गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील, तो सर्वांना बंधनकारक असेल. पालकमंत्रिपदासाठी आपण कोणत्याही प्रकारे आंदोलने केले नाहीत की, पोस्टर जाळलेले नाहीत, असा टोलाही त्यांनी रायगडातील वादासंदर्भात भरत गोगावले यांचे नाव न घेता लगावला.