"...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही"; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:28 IST2024-12-25T15:27:39+5:302024-12-25T15:28:29+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिवादन केले.

"...पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही"; राज ठाकरेंनी वाजपेयींना केलं अभिवादन
"भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी", अशा भावना व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एका कार्यक्रम सोहळ्याला येण्याबद्दलचा किस्साही सांगितला आहे. त्याचबरोबर भारताच्या राजकारणात काँग्रेसला पर्याय नाही, असे वाटत असतानाच्या काळात त्यांनी नवा पर्याय दिला, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांची अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल पोस्ट
आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी.
स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या अनावरण सोहळ्याला अटलजींनी यावं यासाठी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी देखील तात्काळ मान्यता देत, ते या सोहळ्याला आले.
भारतीय राजकारणात काँग्रेसला पर्याय नाहीच असं वाटत असताना, अनेक घटकपक्षांची मोट बांधून, त्यांचे सर्व रागरंग सांभाळून अटलजींनी सरकार चालवलं आणि ते देखील मागच्या शतकाच्या अखेरीस, जेंव्हा भारतात राजकीय, आर्थिक, सामाजिक घुसळण सुरु होती. अशा कठीण परिस्थितीत सरकार चालवत त्यांनी भारतीयांना एक खात्री दिली की काँग्रेसच्या पलीकडे देखील एक राजकीय व्यवस्था या देशाचा कारभार चालवू शकते. आज भारतीय जनता पक्ष जो सत्तेत दिसतोय त्याचा भक्कम पाया अटलजींनी घातला.
साहित्य, संस्कृती, प्राचीन इतिहास अशा विविध विषयांच्या वाचनाने स्फुरलेली अटलजींची वाणी ही जशी मला आकर्षित करते तसंच त्यांच्यातील दुर्दम्य आशावाद देखील मला कायम आकर्षित करत आला आहे. जनसंघ ते भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत असताना, आणि एकदा तर भारतीय जनता पक्ष २ खासदारांवर येऊन थांबलेला असताना आणि जनता पक्षाच्या सरकारमधला सहभाग सोडला तर जवळपास ४५ वर्ष विरोधी बाकांवर बसून देखील त्यांच्यातील राजकीय आशावाद तसूभर पण कमी झाला नाही...
तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून झालेली अहवेलना, आणीबाणीच्या काळात सहन केलेले अत्याचार, हे अटलजींनी सोशिकपणे सोसले, पण सत्तेत आल्यावर त्यांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही, की दीर्घकाळ विरोधी पक्षांत बसलो म्हणून जबर राजकीय महत्वकांक्षा जागृत होऊन त्यांनी सत्तेत आल्यावर राजकीय शालीनता सोडली नाही. म्हणूनच काँग्रेसकट इतर सर्व पक्षातील लोकांच्या मनात अटलजींबद्दल कमालीचा आदर होता आणि आजदेखील आहे.
आज अटलजींची १०० वी जयंती. भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर, कुतूहल होतं आणि ज्या नेत्यांनी देखील माझ्याबद्दलच्या स्नेहात कधीही हात आखडता घेतला नाही, त्यात अटलजी हे अग्रणी.
— Raj Thackeray (@RajThackeray) December 25, 2024
स्व. बाळासाहेबांवरच्या फोटोबायोग्राफ़ीच्या अनावरण सोहळ्याला अटलजींनी यावं यासाठी मी… pic.twitter.com/4lIVlHznLN
सत्तेत नसताना आणि सत्तेत असताना त्यांच्यातील कलासक्त मन त्यांनी कोमेजू दिलं नाही. राजकरण्याच्या मनात फक्त राजकारणाचा विचार असून उपयोग नाही, तर त्यात कलासक्तता देखील हवी. जी अटलजींच्यात होती. अटलजींचे असे अनेक पैलू मला कायम आकर्षित करत आलेत. अटलजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन.