अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 16:36 IST2026-04-04T16:35:41+5:302026-04-04T16:36:44+5:30

ऑपरेशन टायगर बाबतही भाजपचे मोठे विधान

bjp navnath ban slams sanjay raut over ashok kharat case anjali damania inputs operation tiger baramati bypolls | अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार

अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार

अशोक खरात तपासासंदर्भात अंजली दमानिया यांना मिळत असलेला तपशील मुख्यमंत्री कार्यालयातून लीक होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. तशी कोणतीही माहिती मुख्यमंत्री कार्यालय देत नसते. तसा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना उद्धव आणि आदित्य काय करताहेत, त्यांची भूमिका काय आहे याची धड माहिती नाही. नसती उठाठेव करण्यापेक्षा त्यांनी आधी आपल्या पक्षात काय चाललंय याची माहिती घ्यावी, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक खरात प्रकरणाच्या सध्या सुरु असलेल्या तपासातून कुणीतरी भाजपाच्या टार्गेटवर असल्याच्या राऊत यांच्या आरोपाबाबत बन म्हणाले, "भाजपाच्या टार्गेटवर कुणीही नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत नक्कीच जनतेच्या टार्गेटवर आहेत. महायुती म्हणून आम्ही एक आहोत. मात्र जनतेने टार्गेट करून तुम्हाला घरी बसवले आहे. घरच्यांना टार्गेट करायचे ही उद्धव ठाकरे आणि उबाठाची परंपरा आहे. भाजपा मित्रांना सोबत घेऊन चालतो. अंजली दमानिया यांना माहिती नेमकी कुठून मिळत आहे, याचा तपास नक्की होईल."

ऑपरेशन टायगर होणार असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानावर नवनाथ बन म्हणाले, "डिनर डिप्लोमसी हा प्रकार दिल्लीतील राजकारणात नवा नाही. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाचे खासदार, आमदार आणि नगरसेवक कंटाळले आहेत. जेव्हा ४० आमदार सोडून गेले, तेव्हा त्याचा थांगपत्ता उद्धवजींना लागला नाही, संजय राऊत यांना लागला नाही. अहंकाराची भाषा करायची, रोज उठून खोटे बोलायचे या सगळ्याला त्यांच्याच पक्षाचे लोक कंटाळले आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर झाले, तर त्याचा पत्ता संजय राऊत यांना अजिबात लागणार नाही."

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत...

"अजितदादा पवार यांचे निधन हा महाराष्ट्राला बसलेला धक्का आहे. अपघाती निधनानंतर जर पोटनिवडणूक झाली की ती बिनविरोध व्हावी असा महाराष्ट्रात प्रघात असतो. आर.आर. पाटील यांचे निधन झाले तेव्हाही पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती. बारामती येथून सुनेत्राताई निवडणूक लढवणार आहेत. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा महायुतीचा प्रयत्न आहे आणि महायुतीचाच विजय होणार हे निश्चित आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना न विचारता या निवडणुका लढवायची तयारी सुरु केली आहे. त्यातून आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस आपली वेगळी चूल मांडत आहे. दुर्दैवाने काँग्रेसकडे आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्याकडे प्रगल्भता नाही. त्यातूनच ते असे वागत आहेत. मात्र त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही," असेही ते म्हणाले.

Web Title : अशोक खरात मामले पर भाजपा का उद्धव सेना पर पलटवार: राउत पर निशाना

Web Summary : भाजपा ने अशोक खरात मामले के खुलासे से इनकार किया और संजय राउत की आलोचना की। उन्होंने उद्धव और आदित्य पर अज्ञानता और आंतरिक पार्टी समस्याओं का आरोप लगाया। भाजपा का दावा है कि जनता ठाकरे को निशाना बना रही है, आगामी उपचुनावों में जीत का लक्ष्य है, जबकि कांग्रेस को जमानत जब्त होने का सामना करना पड़ेगा।

Web Title : BJP Retorts to Uddhav Sena Over Ashok Kharat Case Details Leak

Web Summary : BJP denies leaking Ashok Kharat case details, criticizing Sanjay Raut. They accuse Uddhav and Aditya of ignorance and internal party issues. BJP asserts the public targets Thackerays, aiming for victory in upcoming by-elections, while Congress faces deposit forfeiture.