"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 10:55 IST2025-11-27T10:50:13+5:302025-11-27T10:55:54+5:30
मालवण नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट आला असून नीलेश राणेंकडून भाजप जिल्हा चिटणीसांच्या घरी थेट स्टिंग ऑपरेशन केल्याने खळबळ उडाली.

"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर
Ravindra Chavan On Nilesh Rane: मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच बुधवारी सायंकाळी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडवून दिली. त्यांनी भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन मतदारांना पैसे वाटपाचा आरोप करत थेट स्टिंग ऑपरेशन केले. पैसे सापडल्याचा प्रकार नीलेश राणे यांनी पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवला आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओही तयार केला.
नीलेश राणे यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह आणि पोलिसांना सोबत घेऊन अचानक केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली. घरात मोठी रक्कम ठेवल्याचा आरोप करत त्यांनी केनवडेकर यांच्याशी थेट सवाल केला. यावेळी घरात मोठी रक्कम सापडल्याचा दावा राणे यांनी केला. त्यांनी तातडीने निवडणूक विभागाच्या पथकाला बोलवले आणि त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
"मालवणमध्ये अशा ५ ते ७ घरांमध्ये पैशांच्या बॅगा येत आहेत. येथून भाजपचे कार्यकर्ते पैसे घेऊन जातात आणि मतदारांना वाटले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेल्यानंतरच हे पैसे आले आहेत," असं नीलेश राणे म्हणाले. राणे यांनी हा प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संस्कृतीला शोभणारा नाही, असे म्हटले आहे. "काही लोक बाहेरून आले आणि हे चुकीचे कल्चर आपल्या जिल्ह्यात आणले. हे थांबले पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
विजय केनवडेकर यांचे स्पष्टीकरण
राणे यांच्या सर्व आरोपांवर केनवडेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. "ही रक्कम पूर्णपणे वैध असून माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे आणि घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधी आमदारांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
रवींद्र चव्हाणांवर आगपाखड
या स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने नीलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य करत अत्यंत गंभीर आरोप केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युती तुटण्याचे मूळ कारण चव्हाणच आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. "भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच जिल्ह्याचं वातावरण गढूळ झालं आहे. काल चव्हाण मालवणमध्ये आले ते केवळ गडबड करण्यासाठी आले होते. त्यांच्यावर माझा संशय होता. भाजप नेत्यांकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही. ते केवळ पैशांचे वाटप करून निवडणुका लढवतात. हे लोक निवडून आल्यावर काम करणार नाहीत, ते केवळ वसुलीच्या कामाला लागतील," असेही नीलेश राणे म्हणाले.
भाजप मंत्री आशिष शेलार यांनी नीलेश राणे यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांची बाजू घेतली.रवींद्र चव्हाण यांनीही राणेंच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
"ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून आणले, त्यांच्या घरी जाऊन अशी कृती करणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटले. गेले काही दिवस त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळं हे असे आरोप केले जात आहेत. सुरुवात कुठून झाली तर युती का केली नाही आणि नंतर मग हळूहळू या गोष्टींनी सुरुवात झाली. ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं, त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन असं कृती करणं चुकीचं आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अधिकार नाही का? फक्त नेत्यांनाच व्यवसाय करण्याचा अधिकार आहे का? पोलीस, निवडणूक आयोग तपास करतील, असं रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, या स्टिंग ऑपरेशनमुळे मालवणमधील निवडणूक अत्यंत संवेदनशील वळणावर आली असून, शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता टोकाचा झाला आहे.