“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:11 IST2025-06-18T20:10:31+5:302025-06-18T20:11:24+5:30

CM Devendra Fadnavis News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमची महायुती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

big setback to congress in sangli jayashree patil join bjp in presence of cm devendra fadnavis | “काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश

“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश

CM Devendra Fadnavis News: दुर्दैवाने आज काँग्रेस पक्षात दिशाहीन नेतृत्व दिसत आहे. त्यामुळे ज्यांना काम करायचे आहे. देशासाठी, समाजासाठी काहीतरी करायचे आहे, त्यांना आपले भवितव्य त्या ठिकाणी दिसत नाही. ज्या प्रकारचे निर्णय होतात. आपल्या सैनिकांच्या विरुद्धच बोलले जाते. सैन्याच्या विरोधात बोलले जाते. त्यामुळे आता त्या कार्यकर्त्यांना तोंड काय दाखवायचे. आपलाच नेता भारतीय सैन्याविरोधात बोलत असेल, तर कार्यकर्त्यांनी उत्तर काय द्यायचे, त्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी निराशा आपल्याला पाहायला मिळत आहे, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी काँग्रेस पक्षातून सातत्याने मोठी घराणी भाजपामध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसचे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरत आहे किंवा चुकांमधून बोध घेण्यास कमी पडत आहे, असे वाटते का, अशा आशयाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेस पक्ष एक प्रकारे दिशाहीन झालेला आहे. आम्ही अनेक वर्षे विरोधी पक्षात काम केले. सत्तेही राहिलो, पण विरोधी पक्ष म्हणून जास्त राहिलो. विरोधी पक्षात असताना आम्ही देशहिताची लाइन कधी सोडली नाही. समाजहिताचा विचार कधी सोडला नाही. म्हणून समाज आमच्यासोबत आला. म्हणून लोक आमच्यासोबत आले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती चांगली कामगिरी करेल

विशेष करून जे जमिनीशी जोडलेले नेते आहेत, त्या नेत्यांचे कुठेतरी खच्चीकरण करायचे, अशा प्रकारचीही परिस्थिती दिसते. म्हणूनच अशा प्रकारचे नेतृत्व आमच्याकडे येत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. निवडणुका असो वा नसो, चांगली मंडळी आम्ही पाहत असतो. चांगली मंडळी दिसली की आम्ही त्यांना पक्षात घेऊन येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसत्या, तरी आम्ही हा प्रयत्न सोडला नसता, आम्ही हा प्रयत्न केलाच असता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमची महायुती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  

दरम्यान, जयश्रीताई पाटील यांच्यासह ज्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, त्यांना एवढेच सांगतो की, भारतीय जनता पार्टी आपला परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखीच वागणूक या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तुम्ही आता या परिवाराचे भाग झालेले आहात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची काळजी घेणे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. ज्या-ज्या ठिकाणी ज्याला जसे काम देणे आवश्यक आहे, जी जबाबदारी देणे आवश्यक आहे, ते त्यांना दिले जाईल. आपण बाहेरून आलो आहोत, अशी भावना कुणाचीही होणार नाही, अशी गॅरंटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

Web Title: big setback to congress in sangli jayashree patil join bjp in presence of cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.