अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जनावरे मृत झाल्यास वाढीव दराने मदत, पात्रतेचे निकष सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 06:28 IST2026-03-28T06:26:54+5:302026-03-28T06:28:43+5:30
राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जनावरे मृत झाल्यास वाढीव दराने मदत, पात्रतेचे निकष सुलभ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः पूरग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे.
राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांमध्ये शिथिलता आणून, सर्व मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी तसेच गोठ्यांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीच्या वितरणासाठी सविस्तर कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर केल्या आहेत.
मदत वितरणासाठी तलाठीमार्फत तहसीलदारांकडे अहवाल पाठवून नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. मृत पशुधनासाठी शवविच्छेदन अहवाल, बेपत्ता प्रकरणात पंचनाम्याची प्रत, लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्याची माहिती जोडणे बंधनकारक असेल.
मदतीसाठी पात्रता काय?
पूर्वी असलेल्या मर्यादा हटवून सरकारने निकष अधिक सुलभ केले आहेत
आता सर्व आपद्ग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र ठरणार
जनावरांच्या संख्येवरील मर्यादा काढून टाकून मृत किंवा बेपत्ता सर्व जनावरे पात्र
कुक्कुटपालनातही मर्यादा शिथिल करून अधिक व्यापक मदत
मृत/बेपत्ता पशुधनासाठी नोंद करणे अनिवार्य
मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी मदत मिळण्यासाठी खालीलपैकी किमान एका ठिकाणी नोंद असणे आवश्यक आहे :
भारत पशुधन ॲप/ २१ वी पशुगणना/लसीकरण नोंदवही / ऑनलाइन नोंद / विमा कंपनीची नोंद/ दुग्ध अनुदान योजनेतील नोंद
पंचनाम्यासाठी अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक
पशुधनाचे नुकसान झाले असल्यास पंचनाम्यासाठी खालील अधिकारी उपस्थित असणे आवश्यक : स्थानिक पशुविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील / सरपंच, सहकारी दूध संघाचा प्रतिनिधी, संबंधित पशुपालक
...तर मदत मिळणार नाही
विमा संरक्षित पशुधनासाठी विमा कंपनीकडून भरपाई मिळाल्यास सरकारी मदत मिळणार नाही.
पशुपालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी व पोलीस पाटील यांची असेल.
निधी वितरणासाठी एनडीआरएफ व राज्य आपत्ती निवारण निधीचा वापर करण्यात येणार.
किती मिळणार मदत?
राज्य सरकारने पशुधनाच्या नुकसानीनुसार खालीलप्रमाणे मदतीचे दर निश्चित केले आहेत.
गोठा नुकसान ३००० रु. प्रति गोठा
दुभती जनावरे ३७,५०० रु. प्रति जनावर
ओढकाम करणारी जनावरे ३२,००० रु. प्रति जनावर
लहान जनावरे २०,००० रु. प्रति जनावर
शेळी/मेंढी ४००० रु. प्रति जनावर
कुक्कुटपालन (कोंबडी) १०० रु. प्रति कोंबडी