Ashok Kharat Case : ३८ आमदारांनी बोट कापलं! देवेंद्र फडणवीसांविरुद्ध अघोरी पूजा; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:17 IST2026-03-25T16:56:30+5:302026-03-25T17:17:35+5:30
Ashok Kharat Case : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात अनेक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

Ashok Kharat Case : ३८ आमदारांनी बोट कापलं! देवेंद्र फडणवीसांविरुद्ध अघोरी पूजा; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे, आता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर ठेवण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
"मी खात्रीने सांगतो, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काहीजण प्रयत्न करत होते. हे सर्वजण अशोक खरातकडे पूजा घालायला गेले होते. वेळ आल्यावर मी त्यांचे नाव उघड करेन. ही सगळी माहिती सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. या नेत्यांच्या खरातसोबत बैठका झाल्या होत्या. तेव्हा अशोक खरात म्हणाला होता, 'मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील, असा दावा आमदार आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला एका गोष्टीचे वाईट वाटतंय की, या तुकारामांच्या महाराष्ट्रात, ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात, शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण काळ्या जादूला इतकी मान्यता देतोय. राजकारणात काळ्या जादूने काहीही होऊ शकते, असे आमदारांना वाटू लागले आहे. माझ्याकडे ३८ आमदारांची लिस्ट आहे, त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या, असा धक्कादायक आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
विधान भवनात परवा सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते, तू खरातकडे जाऊन आलास का, विचारत होते. ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे. या बाबासाठी सरकाराचा पैसा जातोय, रस्ते बनवले जात आहेत. शिक्षण खाते, म्हाडा, एसआरए सगळ्या पोस्टिंग खरातकडून केल्या जात आहेत. हे काय सुरु आहे?, असा सवालही आव्हाड यांनी केला.