अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; या नेत्याने केली मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:15 IST2026-02-07T12:00:43+5:302026-02-07T12:15:55+5:30
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला . या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला आहे.

अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; या नेत्याने केली मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला . या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
अजित पवारांची रिक्त जागा भरण्यासाठी हालचालींना वेग; बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर
विमान अपघातानंतर अनिल देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव या विदीप जाधव यांच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. या भेटीदरम्यान जाधव कुटुंबाने विदीप यांच्या पत्नीच्या नोकरीबाबतची कैफियत मांडली होती. याबाबत पत्रही जाधव यांच्या कुटुंबीयांनी देशमुख यांना दिले होते.
अनिल देशमुख यांच्या पत्रात नेमके काय आहे?
विदीप जाधव यांच्या पत्नी श्रीमती संध्या जाधव या सध्या 'छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा (ठाणे)' येथे 'औषध निर्माण अधिकारी' म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती २०२० मध्ये 'कोविड भरती' अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती.
विदीप जाधव यांनी राज्यासाठी दिलेले बलिदान आणि कुटुंबाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता, त्यांच्या पत्नीला मानवतावादी दृष्टिकोनातून 'विशेष बाब' म्हणून शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, अशी मागणी या पत्रात केली आहे.
संध्या जाधव यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांनी कोविडच्या कठीण काळात दिलेली रुग्णसेवा विचारात घेऊन हा निर्णय घेण्याची विनंती पत्रात करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी या पत्राच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना देऊन या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्याची विनंती केली.