मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:58 IST2024-02-28T13:57:14+5:302024-02-28T13:58:03+5:30
येत्या काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सरकारला करेक्ट कार्यक्रम करतील असा आम्हाला विश्वास आहे असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

मला अडचणीत आणण्यासाठी अजित काकांनी गुंडाला जवळ केलं; रोहित पवारांचा गंभीर आरोप
मुंबई - Rohit Pawar on Ajit Pawar ( Marathi News ) शरद पवारांना मर्यादित ठिकाणी ठेवायचं म्हणून नाही तर भाजपाला पवार विरुद्ध पवार अशी लढाई करायची आहे त्यासाठी हा खटाटोप आहे. अजितदादांकडून कुठला उमेदवार देतील हे पाहावे लागेल. भाजपाकडून बारामतीत पैशांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होईल. गेल्या काही दिवसांत अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत. काहींना नोकरीवरून काढले जातंय कारण ते अजितदादांच्या विरोधात आणि शरद पवारांच्या बाजूने बोलतायेत. अशा स्तरावर गोष्टी जात असतील आणि दादा गुंडांना जवळ करत असतील तर येणाऱ्या काळात बूथ ताब्यात घेण्याचासुद्धा प्रयत्न हा अजितदादांच्या पक्षाकडून केला जाईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर केला आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, बीडमध्ये जे घडलं ते सत्तेतील लोकांनीच केले, गुंडांना आणून ते केले गेले. खरेतर याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. गेल्या काही दिवसांत काही गुंड एकनाथ शिंदेंना भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात, अजित पवारांना गुंड भेटतात. मग लोकसभेला तुम्ही गुंडाचा वापर करणार आहे का? मला वाईट याचं वाटतं देवेंद्र फडणवीस रोज गुंडांना भेटतात, एकनाथ शिंदे भेटत असावेत. पण आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केले. ही तुमची प्रवृत्ती, ही तुमची वृत्ती. भाजपाच्या जवळ गेल्यानंतर अजित पवार गुंडाचा वापर करणार का? असा सवालही त्यांनी विचारला.
तसेच शरद पवार कुठेही अडकून राहत नाहीत. प्रत्येक मतदारसंघात फिरतात. जे लोक सोडून भाजपासोबत गेलेत त्यांनाही निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी प्रचार केलाय. अजितदादा पुण्यात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर करतायेत. माझ्या मतदारसंघात ज्या व्यक्तीला मोक्का लागलाय त्याच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देत आहात? हा महाराष्ट्र आहे, इथली लोक गुंडापेक्षा मोठी आहेत. येत्या काळात लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सरकारला करेक्ट कार्यक्रम करतील असा आम्हाला विश्वास आहे असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
दरम्यान, माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा मांडला. तसे आमचे विरोधक राम शिंदे जागे होतात. फडणवीसांकडे जातात. तिथून उदय सामंतांना फोन करून बैठक लावली जाते. केवळ खुर्ची गरम करणे, कुठलाही निर्णय होणार नाही. आम्ही सर्व काही केले. बैठकीला मला लोकप्रतिनिधी म्हणून बोलावलेही नाही. भाजपा राजकीय षडयंत्र करतंय असा आरोप रोहित पवारांनी केला.
फडणवीसांवर बोलले म्हणून एसआयटी लागत असेल तर...
२ दिवसापूर्वी भाजपाची बैठक झाली. त्यात वातावरण गरम होते. देवेंद्र फडणवीस चिडले होते, फडणवीसांबाबत एवढे बोलले गेले त्यावर भाजपा आमदार बोलले नाहीत. परवा बैठक झाली. त्यानंतर अधिवेशनात काल जे काही पाहिले ते केवळ देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी होते. एसआयटीचे खरे टार्गेट कोण हे पाहावे लागेल. जरांगे पाटील आंदोलन करत होते, तेव्हापासून एकनाथ शिंदेंचे जवळचे सहकारी, ओएसडी हे त्यांच्याशी वाटाघाटी करत होते. देवेंद्र फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लावली जात आहे मग स्पर्धा परीक्षा, भरती यावर पेपरफुटी होत आहे त्यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असं मी म्हणतो, आता एसआयटी लावावी. मी युवांच्या बाजूने फडणवीसांच्या विरोधात बोलतोय. त्यामुळे माझ्यावर एसआयटी लावावी. पेपरफुटीमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचा हात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलीय त्यावर एसआयटी लावणार का? उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर गेले त्यावर एसआयटी लावणार का? नेत्यांबद्दल बोलले तर एसआयटी लागते गरिबांच्या हक्कासाठी बोललो तर एसआयटी लागत नाही का? असा सवाल रोहित पवारांनी केला.