पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:14 IST2026-02-04T20:14:18+5:302026-02-04T20:14:53+5:30
टेकऑफला नियंत्रण कक्षातून परवानगी मिळाली नाही!

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे विमान धावपट्टीवरून दोनदा परतले! लातुरातून उड्डाण रद्द
राजकुमार जाेंधळे
लातूर : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर आलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर विमानतळावरून बुधवारी होणारे उड्डाण अचानक रद्द झाले. विमान दोनवेळा धावपट्टीवरून परत आल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता.
पाणीपुरवठा मंत्री पाटील हे दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी विमानाने लातूरला आले होते. जिल्ह्यातील प्रचार सभा आटोपून त्यांची परतीची वेळ दुपारी ४.३० वाजताची होती. ते ४.४५ वाजेदरम्यान विमानतळावर पोहोचले. त्यानंतर पायलटने मंत्र्यांना घेऊन उड्डाणाची तयारी केली. विमान धावपट्टीवरून धावले, मात्र पुढे जाऊन ते परत आले. पुन्हा दुसऱ्यांदा उड्डाणाचा प्रयत्न केला गेला. मात्र त्याहीवेळी विमान धावपट्टीवरून परत फिरले.
दृष्यमानता होती, तरी परवानगी नाही...
निर्धारित वेळेच्या सुमारासच खासगी विमानाने उड्डाणाची तयारी केली. दृष्यमानता होती. तरीही धावपट्टीवरून दोनवेळा विमान पायलटने परत आणले. या संदर्भात विमानतळ अधिकाऱ्यांना पायलटने माहिती दिली. त्यानुसार हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (एटीसी) परवानगी मिळाली नव्हती. शिवाय, सूर्यास्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी उड्डाणाचा निर्णय घेतला. त्यानंतर लातूर विमानतळावरून नाईट लँडिंग, टेकऑफची सुविधा नाही.