आरोग्य सेवेचे धिंडवडे! रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला; गंभीर रुग्ण भररस्त्यात अर्धा तास तळमळला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:23 IST2026-04-25T20:19:40+5:302026-04-25T20:23:21+5:30
मुरुडमध्ये आपत्कालीन रुग्णवाहिकेचा 'ब्रेकडाऊन'; खासगी रुग्णवाहिकेने रुग्णाला लातूरला हलवले.

आरोग्य सेवेचे धिंडवडे! रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला; गंभीर रुग्ण भररस्त्यात अर्धा तास तळमळला!
मुरुड (जि. लातूर) : विजेच्या धक्क्यामुळे गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णाला उपचारासाठी लातूरला नेताना आपत्कालिन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा पार्ट तुटला. त्यामुळे वेदनेने व्याकूळ रुग्ण अर्धा तास तळमळल्याची घटना शनिवारी दुपारी मुरुड बस स्थानकाजवळ घडली. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेवर संताप व्यक्त होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाठवाडा (ता. कळंब) येथील बालाजी कोकाटे हे शनिवारी शेतात काम करीत होते, तेव्हा त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. त्यात त्यांचे दोन्ही हात, छाती, पोट व पायाजवळचा काही भाग जळाला. उपचारासाठी नातेवाइकांनी खासगी वाहनाने मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. प्रथमोचारानंतर दुपारी २ वा. च्या सुमारास अत्यवस्थ कोकाटे यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे लातूरला पाठविण्यात येत होते. रुग्णालयापासून केवळ २०० मीटर अंतरावरील बस स्थानकाजवळ रुग्णवाहिका गेली असता, रस्त्यातच रुग्णवाहिकेचा खालचा रॉड तुटून पडला. त्यामुळे रुग्णवाहिका बंद पडली. चालक व रुग्णवाहिकेतील डॉ. पाटील यांनी रुग्णाच्या नातेवाइकांच्या मदतीने रुग्णवाहिका रस्त्यातून बाजूला घेतली. मात्र, रविराजाच्या रौद्ररूपामुळे रुग्ण वेदनांनी विव्हळत होता.
दरम्यान, ही माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुकेश सवासे, सूरज कांबळे, समाधान गायकवाड यांना समजताच त्यांनी तत्काळ धाव घेऊन रुग्णाच्या नातेवाइकांना धीर दिला. रुग्णवाहिकेच्या वरिष्ठांशी बोलून दुसरी रुग्णवाहिका पाठवण्याची विनंती केली. मात्र, बराच वेळ लागत असल्याचे पाहून एका खासगी रुग्णवाहिकेद्वारे लातूरला पाठविले.
अर्धा तास उन्हात...
गंभीर रुग्णाला प्रचंड उन्हात जवळपास अर्धा तास रस्त्यावरच होता. त्यामुळे नातेवाईक व नागरिकांतून संताप व्यक्त होऊन रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
गलथान कारभाराबाबत प्रशासनाला जाब...
युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पत्रकार मनोज जोशी यांनी तत्परता दाखवित रुग्णांच्या मदतीसाठी धावले. त्यांची ही संवेदनशीलता, जबाबदारी आणि माणुसकी कौतुकास्पद असल्याची भावना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ. धीरज देशमुख यांनी कौतुक केले. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामीण भागातील रुग्णवाहिकांची सखोल तांत्रिक तपासणी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.