Kolhapur Crime: फिर्याद मागे घ्या, नाहीतर खानदान पेटवणार; धमकावत गुंडांच्या टोळीचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:55 IST2026-02-19T18:54:53+5:302026-02-19T18:55:03+5:30
वर्चस्ववादातून दहशत माजविण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा, एकास अटक

Kolhapur Crime: फिर्याद मागे घ्या, नाहीतर खानदान पेटवणार; धमकावत गुंडांच्या टोळीचा हल्ला
कोल्हापूर : पोलिस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घ्या, नाहीतर तुमचे खानदान पेटवणार, असे धमकावत गुंडांच्या टोळीने सासने नगर येथील श्रुतिका सचिन पोतदार (वय २८) यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. हा प्रकार मंगळवारी (दि. १७) दुपारी घडला. पोतदार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील विशाल मांगोरे (रा. पाचगाव) याला अटक केली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आयटीआयच्या मागे असलेल्या सासने नगर परिसरात तरुणांच्या दोन गटात वर्चस्व वादातून संघर्ष वाढला आहे. आठ महिन्यांपूर्वी काही तरुणांनी घरांसमोर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली होती. त्याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी हल्लेखोरांना अटक करून त्याच परिसरात त्यांची वरात काढली होती.
त्यानंतर काही दिवस शांतता होती. अलीकडे पुन्हा टोळ्यांकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मंगळवारी दुपारी विशाल मांगोरे याच्यासह सहा ते सात जणांनी श्रुतिका पोतदार यांच्या घरावर हल्ला केला. तलवारीने खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजाचे नुकसान केले. तसेच पोलिस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घ्या, नाहीतर तुमचे खानदान पेटवीन, असे धमकावले. याबाबत फिर्याद दाखल होताच पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
विशाल मांगोरे याच्यासह सिद्धेश भांदिगरे (रा. जरगनगर), अजय शेख, विराज मोहिते, आदित्य दबडे आणि अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील मांगोरे याला पोलिसांनी अटक केली. इतरांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
परिसरात दहशत
पोलिसांनी यापूर्वी कारवाई करूनही गुंडांच्या टोळ्यांचा उपद्रव थांबलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत बसणे, रात्री उशिरापर्यंत चौकात दंगामस्ती करणे, रस्त्यात वाढदिवस साजरा करणे, वाहनांची तोडफोड करणे, धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे परिसरात दहशत वाढत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.