पाचवी ते आठवीच्या शाळांत पुन्हा किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:30+5:302021-02-05T06:54:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या एकूण १,५७८ शाळा बुधवारपासून भरल्या. तब्बल ...

पाचवी ते आठवीच्या शाळांत पुन्हा किलबिलाट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या एकूण १,५७८ शाळा बुधवारपासून भरल्या. तब्बल दहा महिन्यांनंतर या शाळांमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. दोन सत्रांमध्ये वर्ग भरले. या शाळांनी विद्यार्थ्यांच्या बॅचेसनुसार एक दिवसआड त्यांचे वर्ग भरविण्याचे नियोजन केले आहे.
कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्चपासून या शाळा बंद झाल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने शाळांना परवानगी दिली. वर्ग सुरू होणार असल्याची सूचना विद्यार्थी, पालकांना दोन आठवड्यांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत येऊ लागले. हमीपत्र दिलेल्या विद्यार्थ्यांची थर्मल गनने तपासणी करून त्यांना वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. त्याठिकाणी कोरोनाचे नियम, अभ्यासक्रम, वर्ग कोणत्या सत्रात आणि कोणत्या दिवशी भरणार, आदी स्वरूपातील माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. एका बेंचवर एक विद्यार्थी अशी बैठक व्यवस्था होती.
-------------------------------
विद्यार्थ्यांमध्ये आनंद
दहा महिन्यांनंतर आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत वर्गामध्ये बसण्यास मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. तास सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर शाळेच्या परिसरात त्यांच्या गप्पा, मस्करी आणि खेळ रंगले. काही पालक त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यास आणि शाळा सुटल्यानंतर घरी नेण्यास आले होते. सकाळी अकरा ते दुपारी एक आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत बहुतांश शाळांमधील पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरले. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत दोन ते तीन बॅचेस करून त्याचे एक दिवसआड वर्ग भरविण्याचे नियोजन शाळांनी केले आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने शाळांचा परिसर गजबजून गेला. दरम्यान, पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एकूण १,५७८ शाळांमध्ये ८० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. १४,७१५ शिक्षक उपस्थित राहिले.
---------------------------------------------
कोट.........
शाळांमध्ये येण्यास विद्यार्थी उत्सुक आहेत. जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या १,५७८ शाळा सुरू झाल्या असून, त्यामधील विद्यार्थ्यांच्या एकूण उपस्थितीचे प्रमाण ८० टक्के आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीची प्रक्रिया सुरू आहे.
-आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
---------------------------------------------
कोट........
शाळेत आल्याने खूप छान वाटत आहे. रोज किमान चार तास तरी वर्ग भरावेत, असे मला वाटते.
- आर्या इंगवले, विद्यार्थिनी, लक्षतीर्थ वसाहत-फुलेवाडी.
---------------------------------------------
कोट........
खूप दिवसांनी वर्गात बसल्याने मस्त वाटले. कोरोनामुळे थोडी भीती वाटत होती. पण, आज शाळेत आल्यानंतर ती दूर झाली.
-प्रसाद हेंबाडे, विद्यार्थी, गोकुळ शिरगाव.
---------------------------------------------
कोट........
बऱ्याच महिन्यांनी मैत्रिणी भेटल्याने बरे वाटले. प्रत्यक्षात वर्गामध्ये बसून शिक्षण घेण्याचा आनंद वाटला.
-आदिती भोसले, विद्यार्थीनी, जवाहरनगर
---------------------------------------------
कोट........
गेल्या सात-आठ महिन्यांपासून ऑनलाईन शिकत आहोत. आज प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने छान वाटले. अभ्यासक्रम पूर्ण व्हावा.
-आदिश पाटील, विद्यार्थी, शिवाजीपेठ