Kolhapur Crime: वडिलांना फोन करून वाईट बोलला, रागातून तिघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:56 IST2026-02-19T11:55:37+5:302026-02-19T11:56:38+5:30
शहापूर येथील घटना : तिघांवर गुन्हा दाखल करून घेतले ताब्यात

Kolhapur Crime: वडिलांना फोन करून वाईट बोलला, रागातून तिघांनी डोक्यात दगड घालून केला मित्राचा खून
इचलकरंजी : वडिलांना फोन करून वाईट बोलल्याच्या रागातून तिघांनी एका मित्राचा खून केला. शाबाज शब्बीर शेख (वय २३, रा. शामरावनगर जाहीर मोहल्ला, सांगली, ता.मिरज) असे खून झालेल्याचे नाव आहे. ही घटना शहापूर येथील सोलगे मळा महालक्ष्मीनगर परिसरात निर्जन ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केल्याचे समजते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
असिफ जिल्लाणी यलकुंद्री, सोहेल सनदी (दोघे रा. शामरावनगर, सांगली,ता.मिरज) आणि असिफचा आत्येभाऊ आखिल मुजावर (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहापूर परिसरातील महालक्ष्मीनगर येथे एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना समजली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, तेथे रक्ताने माखलेला मोठा दगड आणि मृताचे चप्पल आढळले. पोलिसांनी श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथक यांना पाचारण केले. त्यांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले. श्वान पथकाने परिसरातील सोलगे मळ्यापर्यंत माग काढला. हल्लेखोरांनी मृताच्या चेहºयावर दगड घातल्याने चेहरा छिन्नविच्छीन्न बनला होता. त्यामुळे ओळख पटवणे अवघड बनले होते. स्थानिक चौकशी आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत पोलिसांनी शाबाज याच्या नातेवाइकांचा शोध घेतला. त्यांना मृतदेहाची ओळख पटली.
खुनाचा तपास करण्यासाठी शहापूर पोलिसांसह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून प्रयत्न सुरू होते. नावे समजल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. प्राथमिक चौकशीत शाबाज व हल्लेखोर हे एकमेकांचे चांगले मित्र होते. सोमवारी (दि. १६) शाबाज याने असिफ व सोहेल यांना सोबत घेऊन इचलकरंजीत आला होता. त्यानंतर काही कारणातून शाबाज याने असिफ याच्या वडिलांना फोन करून वाईट बोलला होता. याचा राग मनात धरून असिफ, सोहेल आणि आखिल यांनी संगनमत करून त्याचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी विदारक चित्र
घटनास्थळावर शाबाज याचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मृतदेहाजवळ रक्तांनी माखलेला दगड होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला.
ओळख पटविण्याचे होते आव्हान
मृतदेहाचा चेहरा विद्रुप करण्यात आला असल्याने त्याची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक सतीश सूर्यवंशी यांनी भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली. तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीवरून मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.