भाड्यावरून वाद; घाई-गडबडीत निघालेल्या रिक्षाचालकाने महिलेस शंभर फूट फरफटत नेले, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 14:24 IST2023-07-07T14:23:28+5:302023-07-07T14:24:36+5:30
मारहाण होईल या भीतीने त्याने रिक्षा थांबवली नाही

भाड्यावरून वाद; घाई-गडबडीत निघालेल्या रिक्षाचालकाने महिलेस शंभर फूट फरफटत नेले, कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादानंतर घाई-गडबडीत निघालेल्या रिक्षाच्या गार्डमध्ये साडी अडकल्याने रिक्षाचालकाने महिलेस सुमारे शंभर मीटर फरफटत नेले. गुरुवारी (दि. ६) दुपारी दीडच्या सुमारास सायबर चौक ते माउली पुतळा मार्गावर झालेल्या घटनेत मीना धनपाल साठे (वय ६२, रा. पंत मंदिराजवळ, राजारामपुरी, १४ वी गल्ली, कोल्हापूर) या जखमी झाल्या. याबाबत रिक्षाचालक सज्जाद अमिद मोमीन याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
फिर्यादी किरण धनपाल साठे (वय ४५, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आई मीना या गुरुवारी दुपारी रिक्षाने घरी आल्या. रिक्षाच्या भाड्यावरून त्यांचा रिक्षाचालकाशी किरकोळ वाद झाला. त्यावेळी परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्याने घाबरलेल्या रिक्षाचालकाने घाई-गडबडीत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी पाठीमागे रिक्षाला टेकून उभ्या असलेल्या मीना साठे यांच्या साडीचा पदर रिक्षाच्या गार्डमध्ये अडकल्याने रिक्षाने त्यांना फरफटत नेले. हा प्रकार पाहून रस्त्यावरील लोक रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, मारहाण होईल या भीतीने त्याने रिक्षा थांबवली नाही. अखेर महिला रिक्षासोबत फरफटत असल्याचे लक्षात येताच त्याने रिक्षा थांबवली. जखमी महिलेवर सीपीआरमध्ये उपचार करण्यात आले. किरण साठे यांच्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी रिक्षाचालक मोमीन याच्यावर गुन्हा दाखल केला.