लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : सुपर केन नर्सरी या आधुनिक तंत्राद्वारे ऊसाचे २०० टन उत्पादनाचे सूत्र आपण अंमलात आणू शकतो. श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांना माती, पाणी, पाने परीक्षण व इतर मार्गदर्शन मोफत दिले जाते. शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा व शेतातून निघणाऱ्या उत्पन्नाचा बारकाईने विचार करणे गरजेचे आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे निघेल, हे पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी श्री दत्त कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
येथील श्री दत्त साखर कारखान्याच्यावतीने स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मौजे आगर (ता. शिरोळ) येथील गणपती मंदिर सभागृहात ऊस पीक चर्चासत्र, शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमोल चव्हाण होते. यावेळी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. नीलेश मालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. वीरशैव बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गणपतराव पाटील यांचा तसेच धरणगुत्ती ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. मालेकर म्हणाले, ऊस उत्पादन वाढीमध्ये श्री दत्त कारखान्याचे व्यवस्थापन देशातच नव्हे तर परदेशात लौकिक मिळवत आहे. ‘दत्त’चे मॉडेल यशस्वी झाले आहे. शेतकऱ्यांविषयी गणपतराव पाटील यांची असलेली तळमळ दुर्मीळ आहे.
यावेळी शेखर पाटील, महेंद्र बागी, भालचंद्र लंगरे, सुरेश आरगे, मनोहर माळी, भाऊसो कांबळे, आप्पासो पाटील, बाबासो कारंडे, दिलीप पाटील, मानसिंगराव पाटील, श्रीशैल हेगान्ना, दिलीप जाधव, ए. एस. पाटील उपस्थित होते.
फोटो – 23012021-जेएवाय-02
फोटो ओळ – मौजे आगर (ता. शिरोळ) येथे ऊस पिक चर्चासत्रात गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.