व्यासपीठावर जाताच शाहिराने सोडले जग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:23 AM2021-01-21T04:23:56+5:302021-01-21T04:23:56+5:30
दिंडनेर्ली : जगालाही वेड लावलं, जिवालाही वेड लावलं, या वयात दारूनं, मानव देहाला टाकलं की ओ जाळून....या या ...
दिंडनेर्ली : जगालाही वेड लावलं, जिवालाही वेड लावलं, या वयात दारूनं, मानव देहाला टाकलं की ओ जाळून....या या दारूनं.. या शाहिरी गीतातून महाराष्ट्रभर व्यसनमुक्तीविषयी जनजागरण करणारे महाराष्ट्रातील पहिले रेडिओ स्टार शाहीर शंकर गणपती पाटील (वय ८३, रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) यांचे आकस्मिक निधन झाले.
कोरोनाच्या संदर्भात शासनाने लोककलेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यासाठी शाहीर शंकर गणपती पाटील यांच्या आझाद हिंद शायरी कलापथकाला कार्यक्रम दिले होते. कार्यक्रमाचा बुधवारी पहिलाच दिवस होता. हुपरी (ता. हातकणंगले) येथे कार्यक्रम सादर करण्यासाठी शाहीर पाटील व्यासपीठावर जात होते इतक्यात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते स्टेजवर कोसळले. काही कळायच्या आतच शाहिरी कलेचा उपासक हातात डफ घेऊनच सर्वांच्यातून निघून गेला. १९७५ च्या दरम्यान जेव्हा टीव्ही नव्हती, तेव्हा शंकर शाहीर यांचे कार्यक्रम रेडिओवरती प्रसारित केले जायचे. १९९७ मध्ये लखनऊमध्ये जेव्हा शाहू महाराजांचा पुतळा उभारला, तेव्हा मायावतींच्या हस्ते पाटील यांना शाहू पुरस्कारही देण्यात आला होता. आझाद हिंद शाहिरी परिषद दिंडनेर्ली या माध्यमातून शाहिरांनी सलग पंचवीस वर्षे महाराष्ट्र शासनाचे सामाजिक कार्यक्रम केले आहेत. याचबरोबर त्यांनी कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांतही शासकीय कार्यक्रम केले आहेत. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे ते अगदी जवळचे शाहीर होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रसंगी शाहीर कार्यक्रम सादर करीत असताना त्यांना अटक केली होती, तेव्हा त्यांनी हिंडलगा तुरुंगामध्ये पाच दिवस तुरुंगवासही भोगला आहे.