लोकभावनेला मान्यता देत सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST2021-02-05T06:56:10+5:302021-02-05T06:56:10+5:30
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि स्टुडंट्स फेडरेशनतर्फे आयोजित किसानपुत्र संघर्ष यात्रेच्या प्रारंभावेळी न्यू ...

लोकभावनेला मान्यता देत सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत
दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि स्टुडंट्स फेडरेशनतर्फे आयोजित किसानपुत्र संघर्ष यात्रेच्या प्रारंभावेळी न्यू कॉलेजमध्ये ते बोलत होते. दिल्लीमध्ये न्याय मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. हे कायदे मंजूर करताना भारतीय संसदीय पद्धतीला अभिप्रेत असलेल्या सर्व प्रक्रियांचे तंतोतंत पालन झालेले नाही. घटकराज्यांना विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सध्या देशात निर्माण झालेल्या राजकीय, सामाजिक, मानसिक तणावातून शेतकऱ्यांसह सर्वांना बाहेर काढण्यासाठी हे कृषी कायदे सरकारने मागे घेणे आवश्यक असल्याचे डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले.
सरकारने अन्यायकारक तीन कृषी विधेयके मागे घ्यावीत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्याशिवाय युवक शांत बसणार नसल्याचे यूथ फेडरेशनचे गिरीश फोंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलांनी उचललेले पाऊल हे राजर्षी शाहू महाराज यांच्या शेती धोरणाशी सुसंगत असल्याचे न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही. एम. पाटील यांनी सांगितले.
यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील पांडुरंग धनगर (कोथळी), परशुराम अलकनुरे (गडहिंग्लज) यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बी. एल. बर्गे, टी. के. सरगर, धीरज कठारे, हर्षवर्धन कांबळे, संदेश माने, केदार तहसीलदार, योगेश कसबे, कृष्णा पानसे, बाबूराव घुरके, जावेद तांबोळी, सुनील कोळी, अजिंक्य बेर्डे, राम करे, प्रदीप फोंडे, संकेत कदम, श्रीकांत कोळी, आदी उपस्थित होते. शाहीर रणजित कांबळे यांनी शेतकरी, प्रेरणादायी गीते सादर केली. यूथ फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा आरती रेडेकर यांनी स्वागत केले. स्टुडंट्स फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांनी संघर्ष यात्रेचे स्वरूप सांगितले. जिल्हाध्यक्ष हरीश कांबळे यांनी आभार मानले.
चौकट
यात्रेच्या माध्यमातून जनजागरण
चळवळीची गाणी गात, घोषणा देत अनेक मोटारसायकली, चारचाकी सजवून किसान पुत्र संघर्ष यात्रेतील युवक, युवती, कार्यकर्त्यांनी शाहू समाधिस्थळ येथे येऊन अभिवादन केले. शिंगणापूरमध्ये शेतकऱ्यांची जनजागरण सभा घेण्यात आली. त्यानंतर यात्रा सांगलीच्या दिशेने रवाना झाली. सातारा, पुणे आणि दिल्ली येथे यात्रा जाणार आहे. मुंबईतून दि. ८ रोजी राज्यभरातील सर्व जथ्थे गुजरात, राजस्थानमार्गे सिंधू बॉर्डरला पोहोचणार असल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले.
चौकट
अन्यायकारी कृषी कायदे मागे घ्या
संघर्ष यात्रेच्या प्रारंभावेळी ‘जय जवान - जय किसान’, ‘कौन बनाया हिंदुस्तान भारत के मजदूर किसान’, ‘शेतकरी राजा, आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘अन्यायकारी कृषी कायदे मागे घ्या’, ‘छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या शेती धोरणाचा विजय असो’ अशा घोषणांनी तरुणाईने न्यू कॉलेजचा परिसर दणाणून सोडला.