प्रक्रिया केलेले सांडपाणी १२ गावांतील शेतीला पुरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:23+5:302021-01-21T04:22:23+5:30
लढा पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा-०२ विश्र्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी १८ ...

प्रक्रिया केलेले सांडपाणी १२ गावांतील शेतीला पुरवणार
लढा पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा-०२
विश्र्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी १८ किलोमीटर जलवाहिनी टाकून किमान १२ गावांतील थेट शेतीला पुरविण्याचा विचार महापालिकेने केला आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यातील दीर्घकालीन उपाययोजना म्हणून या प्रकल्पाचा आराखडाही तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांना जो २२० कोटीचा आराखडा सुचवला आहे, त्यामध्ये याचा समावेश करण्यात येणार आहे.
सध्या शहरात ९६ दशलक्ष घनमीटर सांडपाणी तयार होते. त्यातील ९१ दशलक्ष घनमीटर पाण्यावर महापालिका प्रक्रिया करते. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचे नक्की काय करायचे, असाही प्रश्न आहे. या पाण्याचा वापर शहरांतील सार्वजनिक बागांना, रस्ते दुभाजकांवरील झाडे, नव्याने होणारी बांधकामे यासाठी केला जावा, असा नियम आहे. परंतु त्यासाठी जास्तीत जास्त दोन दशलक्ष घनमीटर पाणीच लागते, असा महापालिकेचा अनुभव आहे. त्यामुळे एवढे पाणी नदीत सोडण्यापेक्षा ते कोल्हापूरपासून पूर्वेकडील नदीकाठावरील किमान १२ गावांना १८ किलोमीटर जलवाहिनी घालून सायफन पध्दतीने पुरविण्याचा विचार महापालिकेने केला आहे. त्यासाठी २५ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या गावांमध्ये सध्या सुरू असलेल्या उपसा जलसिंचन योजनांची माहिती घेतली जात आहे. त्यांच्या योजनांच्या जॅकवेलमध्येच हे पाणी सोडले जाणार आहे. नदीतील पाणी उपसा करून ते शेतीला पुरवण्यापेक्षा हे पिकांना पूरक असलेले पाणीच त्यांनी द्यावे, असा प्रयत्न आहे. त्या योजना पाणीपट्टी पाटबंधारेकडे भरत होत्या, त्यातील रकमेत महापालिका त्यांना पाणी पुरवठा करू शकते. उन्हाळ्यात नदीला पाणी नसले तर शेतीला टंचाई जाणवते. परंतु या पाण्याचे तसे नाही. जोपर्यंत कोल्हापूर शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत राहील. तोपर्यंत हे किमान शंभर दशलक्ष घनमीटर पाणी शेतीलाही उपलब्ध होऊ शकेल.
कोल्हापूर शहराला मुबलक पाणी आहे. कोल्हापुरातील पाणी टंचाई ही कधीच पाण्याची नव्हती व नाही. ती नियोजनातील दूरदृष्टीची होती. महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत, की तिथे आजही आठवड्यातून एकदा, पंधरवड्यातून एकदा सार्वजनिक नळाला पाणी येते. कोल्हापूर तसे शाहू महाराजांच्या कृपेने भाग्यवान आहे. परंतु तरीही हल्ली कुणीही घर बांधायला सुरू केले की, पहिल्यांदा कूपनलिका खोदून घेतो. त्या परिसरात महापालिकेचे पाणी पुरेसे येते का, त्याची खरेच टंचाई आहे का, कूपनलिकेची गरज तरी आहे का, याचा विचार न करता कूपनलिका खोदली जाते. व्यक्तिगत वापराशिवाय, सार्वजनिक ठिकाणी महापालिकेनेही कूपनलिका खोदल्या आहेत. हॉटेल्स, सर्व्हिसिंग सेंटरपासून अनेक ठिकाणी या कूपनलिकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्या एकूण किती आहेत याची नोंद महापालिकेकडे नाही.
४० विहिरी..
कोल्हापुरात महापालिकेच्याच मालकीच्या किमान ४० विहिरी आहेत. त्यावर महापालिकेनेच स्वत: वीज पंप बसविले आहेत. त्यातूनही पाणी पुरवठा होतो.
मग त्यांना का अधिभार नाही?
कोल्हापूर महापालिका स्वत:च्या पाणी योजनेतून पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरावर व सांडपाण्यावरही नियंत्रण राखण्यात यशस्वी झाली असली तरी, कूपनलिकांतून उपलब्ध होणारे पाणी व त्यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यातून होणारे प्रदूषण हे अजूनही महापालिकेच्या अजेंड्यावर नाही. त्याचे सर्वेक्षण होऊन कूपनलिकांच्या पाण्यालाही सांडपाणी अधिभार लावण्याची गरज आहे.
भूजल यंत्रणेने माहिती मागवली..
भूजल सर्वेक्षण यंत्रणेनेही महापालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांकडून शहरातील खासगी व सार्वजनिक कूपनलिका, हातपंप व विहिरींची माहिती मागवली आहे.
(फोटो पाठवत आहे)