कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:34 PM2023-07-27T16:34:35+5:302023-07-27T16:35:36+5:30

सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे 

Panchgange water level rise in Kolhapur, 82 dams under water; The administration is vigilant with the dissolution of Radhanagari | कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

googlenewsNext

कोल्हापूर : शहरात आज दुपारपासून पावसाचा जोर कमी असला तरी जिल्ह्यात संततधार सुरुच आहे. धरणपाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 40ʼ08'' फुटावर गेली आहे. तर ८२ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे. 

आज, गुरुवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३, ४ तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात काल, बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर एकदम कमी झाला. दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या, मात्र पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात एक इंचाने कमी झाली. आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तसेच ‘राधानगरी’तून विसर्ग सुरु असल्याने नदी पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. अचानक पाणी वाढले तर रात्रीच्या वेळी जायचे कोठे? म्हणून नागरिक सावध राहिले आहेत.

चार तालुक्यांनी सरासरी ओलांडली

गेल्या वर्षी जून व जुलैमध्ये सरासरी ६२९ मिलीमीटर पाऊस झाला होता. जून कोरडा गेल्याने यंदा सरासरी गाठणार का? असे वाटत असतानाच गेल्या २० दिवसात जोरदार पाऊस कोसळला. आतापर्यंत जून व जुलैमध्ये सरासरी ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

दृष्टिक्षेपात अलमट्टी धरण :
पाण्याची आवक : प्रतिसेंकद १ लाख ३८ हजार ४७३ घनफूट
जावक : १४ हजार ६९० घनफूट
क्षमता : १२३ टीएमसी
भरले : ६४ टीएमसी
दृष्टिक्षेपात स्थलांतरित कुटुंबे :

एकूण निवारागृहे : ४७८
ग्रामीण : ६५ कुटुंबातील ३१९ नागरिक व १२७ जनावरे
महापालिका : १५ कुटुंबातील ५१ नागरिक
पडझडीत १६ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात ४४ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १६ लाख २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

प्रमुख धरणातील साठा टक्के व कंसात विसर्ग प्रतिसेकंद घनफूट असा -
राधानगरी : १०० (८५४०)
वारणा : ८१ ( ९११)
कासारी : ७९ (१०००)
कडवी : ९० (१८०)
कुंभी : ८१ (७००)
घटप्रभा : १०० ( ३९९३)
जांबरे : १०० (२०२०)
कोदे : १०० (१२३१)

  • अलमट्टी विसर्ग : प्रतिसेकंद ७५ हजार घनफूट
  • पूरबाधित गावातील शाळांना सुट्टीच
  • गुरुवारसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट
  • भोगावती नदीवरील बालिंगा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु

Web Title: Panchgange water level rise in Kolhapur, 82 dams under water; The administration is vigilant with the dissolution of Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.