Kolhapur Crime: चैनीसाठी पैशांची गरज, चहात विषारी रसायन घालून नातवानेच केला आजीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:43 IST2026-02-21T11:42:48+5:302026-02-21T11:43:20+5:30
मृत्यूची खात्री केली.. दागिने लुटले..

Kolhapur Crime: चैनीसाठी पैशांची गरज, चहात विषारी रसायन घालून नातवानेच केला आजीचा खून
कोल्हापूर : चैनीसाठी दागिने लुटण्याकरिता चहातून मोरचूद केमिकल पाजून चुलत नातवाने गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या उषा मारुती भिऊंगडे (वय ७२) यांचा खून केल्याचे शुक्रवारी उघड झाले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवून त्यांचा नातू प्रेम परशराम भिऊंगडे (वय २०, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली. त्याने चैनीसाठी पैशांची गरज असल्याने सोन्याचे दागिने लुटण्यासाठी खून केल्याची कबुली पोलिस तपासात दिली.
पोलिसांनी सांगितले की, उषा भिऊंगडे या पतीसह राहात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने त्या एकट्याच घरी राहात होत्या. त्यानंतर पुतण्या परशराम त्यांना औषधे व इतर मदत करत असे. सोमवारी उषा या घरी बेशुद्ध पडल्या होत्या. त्यावेळी परशराम याने त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र त्या उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाचा: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने केला खून
त्याचवेळी उषा यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांची दिनयर्चा, त्यांच्यावर सुरू असलेले औषधोपचार, त्यांचे शेजारी व नातेवाईक अशा वेगवेगळ्या पातळीवरील माहिती घेऊन तपास केला.
त्यावेळी मयत उषा यांचा चुलत नातू प्रेम मृत्यूच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी घरी येऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे प्रेम भिऊंगडे याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने चैनीसाठी पैशांची गरज होती. त्याला उषा यांचे दागिने लुटायचे होते. म्हणून सोन्यात वापरण्यात येणारे मोरचूद हे केमिकल मानवी जीवितास अपायकारक आहे, याची माहिती असताना ते चहामध्ये टाकले. तो चहा उषा यांना दिला. त्या चहा प्यायल्यानंतर बेशुद्ध पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास केला.
मृत्यूची खात्री केली.. दागिने लुटले..
मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रेम याने उषा यांच्या दोन्ही हातातील सोन्याच्या सहा पाटल्या, गळ्यातील दाेन सोन्याच्या चेन, उजव्या कानातील फुल अशा सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. उषा या वयोवृद्ध असल्याने त्यांचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.