‘भुदरगड’च्या संवर्धनाची गरज

By Admin | Updated: December 16, 2014 23:50 IST2014-12-16T23:05:53+5:302014-12-16T23:50:22+5:30

पुरातत्व विभाग उदासीन : विकासाऐवजी भकासच

The need for conservation of 'Bhudargad' | ‘भुदरगड’च्या संवर्धनाची गरज

‘भुदरगड’च्या संवर्धनाची गरज

शिवाजी सावंत - गारगोटी --ज्या गडाच्या नावावरून तालुक्याला नाव मिळाले, तो गड म्हणजे ‘भुदरगड’. राजांच्या लढाया ते स्वातंत्र्यासाठी सामान्य गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध देशात सर्वप्रथम उठाव करून स्वातंत्र्यासाठी पहिली तोफ डागणारा गड असा देदीप्यमान इतिहास असणारा गड शासन आणि पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे भकास होत आहे.
शिलाहारवंशीय राजा भोज (दुसरा) यांनी इसवी सनाच्या बाराव्या शतकात या गडाची उभारणी केली. विस्तीर्ण पठार आणि बेसॉल्टच्या खडकावर उभा असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून ९७२ मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर नाही इतक्या मोठ्या म्हणजे १.४ हेक्टर क्षेत्रावर तलाव आहे. वैशिष्ट्य म्हणजे तलावातील बेसॉल्ट खडकावर कधीही पाणी साचत नाही; पण पाणी मात्र बारमाही असते. शिवाय या पाण्याला अवीट अशी चव आहे. तालुक्यात सापडणाऱ्या वनौषधींपैकी बहुतांशी वनस्पती या गडाच्या सभोवताली आढळतात. या गडावर वाघ, रावे, खवल्या मांजर यासारख्या वन्यपशूंचा वावर आहे. गडाची तटबंदी बांधताना रक्षणासाठी असणाऱ्या सैनिकांकरिता तटबंदीत शौचकुपीची व्यवस्था आहे. या शौचकुपीतील मल:निस्सारण कोठे होते हे समजतही नाही. शिवाय दुर्गंधी पसरू नये याची काळजी इसवी सन बाराव्या शतकात घेतली होती.
शिलाहार राजाच्या राजवटीनंतर बरीच वर्षे हा गड आदिलशाहीत होता. १६६७ मध्ये हा गड शिवरायांनी स्वराज्यात आणला. काही कारणांनी तटबंदीची पडझड झाली होती, म्हणून शहाजी राजांनी या गडाची पुनर्बांधणी करून एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले होते; पण गड ताब्यातून गेला याची सल आदिलशाही राजवटीला होती. त्यांनी आक्रमण करून हा गडपुन्हा हस्तगत केला. १६७२ मध्ये महाराजांनी हा गड हस्तगत केला. त्यावेळी मराठी सरदारांनी अपार शौर्याने हा गड मिळविला. यावेळी झालेल्या लढाईत आदिलशाहीतील सरदाराचा पराभव करून त्याचा शिरच्छेद केला, म्हणून छत्रपतींनी इथल्या शूर सरदारांना मानाचे निशाण प्रदान केले होते. ते आजही गडावर डौलाने फडकत आहेत. जिंजीवरून परत येताना राजाराम महाराज काही काळ या गडावर वास्तव्यास असल्याचा पुरावा आहे.
१८ वे शतक सरताना परशुराम भाऊ पटवर्धनांनी हा किल्ला घेतला. पटवर्धनांकडून दहा वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी पुन्हा हा किल्ला जिंकला. १८४४ मध्ये इंग्रज सरकार विरुद्धच्या लढाईत बाबाजी आयरेकर या शूर गडकऱ्याला सुभाना निकम यांनी ३०० साथीदारांसह साथ दिली. तात्या टोपेंच्या उठावाअगोदर १३ वर्षे या गडावरील गडकऱ्यांनी तीन महिने इंग्रजांना झुंजवत ठेवले. बिगरसैनिकांनी इतकी निकराची लढाई लढण्याची ही एकमेव घटना आहे.
निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आणि गारगोटीपासून चौदा किलोमीटर अंतरावर असणारा, कोणत्याही वाहनाने गडावर जाता येणारा असा हा किल्ला पर्यटक आणि अभ्यासकांना नेहमी खुणावत असतो. या गडाचे संवर्धन करण्यासाठी गडकऱ्यांच्या वारसदाराने एकत्र येऊन देशातील पहिले प्रतिष्ठान स्थापन केले. इतिहास संशोधक रविराज निंबाळकर आणि त्यांच्या प्रतिष्ठानातील सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. ही संघटना गडाच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील आहे. कलनाकवाडी ग्रामस्थांनी गडावर श्रमदानाने सफाई केली. या गडाच्या विकासासाठी १३ व्या वित्त आयोगातून एक कोटी ७५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या विकासकामात गडकोटांच्या भिंतीचे संवर्धन करण्याऐवजी ती सिमेंट व चिऱ्यात पुन्हा बांधण्याचा प्रयत्न केला जात होता. जतन होण्याऐवजी पुर्नबांधकाम होत असल्याने गडकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे.
राजेरजवाडे ते स्वराज्य ते स्वातंत्र्य अशा सर्व सर्व टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या गडाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कारण इतिहासाबरोबर सभोवताली असणारी दुर्मीळ वनौषधी यांचा ऱ्हास होण्याअगोदर संवर्धन व्हावे, अशी तालुकावासीयांची मागणी आहे.


गडकऱ्यांच्या वारसांचे देशातील पहिले प्रतिष्ठान
गडकरी आणि शूरवीरांचा वारसा सांगणारे अनेक वारसदार आहेत; पण आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान व पराक्रमी इतिहास जतन आणि संवर्धन करून जनजागृती करण्यासाठी स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करणारे आणि एक वेगळा विचार उराशी बाळगून देशातील पहिले प्रतिष्ठान येथे स्थापन झाले.



स्वातंत्र्याची पहिली ठिणगी
१८४४ ला सामान्य गडकऱ्यांनी इंग्रजांना तीन महिने हा गड जिंकू दिला नव्हता. खऱ्या अर्थाने हा इतिहास संशोधित होऊन त्याचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा.
दोन सेकंदांत उमलणारे फूल ‘सेपोमिया’
वर्षातील केवळ एक दिवस आयुष्य असणारे, पण अवघ्या दोन सेकंदांत उमलणारे सेपोमिया नावाचे फूल येथे आढळते. हे फूल उमलण्यासाठी विशिष्ट अनुकूल असे वातावरण असावे लागते, ते केवळ येथे आहे.

स्वातंत्र्याची पहिली ठिणगी
१८४४ ला सामान्य गडकऱ्यांनी इंग्रजांना तीन महिने हा गड जिंकू दिला नव्हता. खऱ्या अर्थाने हा इतिहास संशोधित होऊन त्याचा पाठ्यपुस्तकात समावेश व्हावा.
दोन सेकंदांत उमलणारे फूल ‘सेपोमिया’
वर्षातील केवळ एक दिवस आयुष्य असणारे, पण अवघ्या दोन सेकंदांत उमलणारे सेपोमिया नावाचे फूल येथे आढळते. हे फूल उमलण्यासाठी विशिष्ट अनुकूल असे वातावरण असावे लागते, ते केवळ येथे आहे.

Web Title: The need for conservation of 'Bhudargad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.