Kolhapur: भिकूआबा, आम्हासनी आता पाणी आल्याचे कोण सांगणार; गव्याच्या हल्ल्यात झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:58 IST2025-06-09T15:56:56+5:302025-06-09T15:58:31+5:30
भिकूआबांच्यावर गव्याने हल्ला केल्याची बातमी गावात पसरली अन् सारा गाव सुन्न झाला

Kolhapur: भिकूआबा, आम्हासनी आता पाणी आल्याचे कोण सांगणार; गव्याच्या हल्ल्यात झाला मृत्यू
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड : मनमिळाऊ स्वभाव, वारकरी असल्याने भजन कीर्तनाची आवड, गावात कोणाचेही कसलेही कार्य असो भिकूआबा व त्यांचा मुलगा शिवाजी दिसणारच. भिकूआबा गावच्या नळ योजनेचे पाणी सोडायचे, तर शिवाजी उत्तम आचारी. त्यामुळे ही बापलेकांची जोडी गावातील कोणाच्याही कार्यकमात दिसणारच, असेच समीकरण बनले होते, पण आज भिकूआबांच्यावर गव्याने हल्ला केल्याची बातमी गावात पसरली अन् सारा गाव सुन्न झाला. घटनास्थळी जमलेल्या महिलांनी भिकूआबा आम्हासनी उद्या पाणी कोण देणार म्हणत हंबरडा फोडला.
वाचा- शेताकडे जाताना दबा धरुन बसलेल्या गव्याचा हल्ला, शेतकरी जागीच ठार
आपटाळपैकी कुदळवाडी (ता. राधानगरी) येथील भिकाजी गुंडू बेरकळ (वय ६५) हे शेतीच्या कामासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे चालले होते. दरम्यान, कडक नावाच्या शेताजवळ येताच गव्याने जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की, गव्याची शिंगे त्यांच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली. छातीवर जोरदार धडक बसल्याने मोठा रक्तस्त्राव झाला.
पाणी येणार..अशी आरोळी झाली अबोल
ही बातमी गावकऱ्यांना कळताच सारा शिवार माणसांनी फुलला. प्रत्येकजण त्या मृतदेहाकडे पाहून सुन्न झाला. भिकूआबा म्हणजे गावातील सर्वांसाठी आपलंस वाटणारं व्यक्तिमत्त्व. प्रत्येकाच्या घराघरात पोहोचून पाणी येणार आहे भरून घ्या, अशी आरोळी असो अथवा आबांच्या मुखातून निघणारे अभंगाचे स्वर साऱ्यांनाच आपलंसं करून टाकणारे हाेते, पण हे सर्व आज स्तब्ध झाले.