कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त लागेना, जमीन संपादन प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने फेरनिविदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 11:48 IST2026-02-21T11:47:27+5:302026-02-21T11:48:04+5:30
६ एप्रिलपर्यंत निविदा भरता येणार

संग्रहित छाया
कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर फेरनिविदा काढण्याची नामुष्की ओढवली. फेरनिविदा ६ एप्रिलपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. या महामार्गाचे भिजत घोंगडे अनेक वर्षे असून त्याला मुहूर्त तरी कधी लागणार? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
कोल्हापूर ते सांगली हा ३३ किलोमीटरचा महामार्ग असून गेली अनेक वर्षे काम रखडलेले आहे. याबाबत, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कामाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जमीन संपादन प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण न झाल्याने नव्याने निविदा प्रसिद्ध करावी लागली.
सांगली ते चोकाक आणि चोकाक ते अंकली फाटा अशा दोन टप्प्यांत रस्त्याचे काम होणार असून त्यासाठी ९३७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकानुसार निविदा १७ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. ६ एप्रिलपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत असून ७ एप्रिलला सकाळी साडेअकरा वाजता तांत्रिक बीड ओपन केले जाणार आहे. त्यानंतर फायनान्शियल बीड प्रक्रिया होऊन ठेकेदारांची निवड केली जाणार आहे.
वेगवान प्रवासासाठी प्रतीक्षा
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी कमी होणार असली तरी प्रत्यक्षात कामाची सुरुवात पावसाळ्यानंतरच होणार आहे. त्यामुळे आणखी काही महिने वेगवान प्रवासासाठी वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.