Kolhapur Rain: गारपीट, वादळी वारे, पावसाने उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:03 IST2026-03-28T16:03:18+5:302026-03-28T16:03:40+5:30
आगामी चार दिवस असे राहील वातावरण...

Kolhapur Rain: गारपीट, वादळी वारे, पावसाने उडाली तारांबळ
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. शहरात सुमारे तास-दीड तास हलका पाऊस राहिल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. मात्र, उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा सुखद गारवा मिळाला. आज, शनिवारी ढगाळ हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. गुरुवारी सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण झाले, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळी काही काळ ढगाळ हवामान राहिले. दिवसभर कमालीचा उष्मा होता, सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तास-दीड तास हलक्या सरी कोसळत राहिल्या. त्यामुळे दिवसभर तापलेले वातावरण काहीसे थंड झाले.
दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्याचे किमान तापमान २३ डिग्री व कमाल तापमान ३७ डिग्री पर्यंत राहिले होते. आज, शनिवारी कमाल व किमान तापमानात वाढ होणार नाही. साधारणत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
वीट व्यावसायिकांची तारांबळ
पावसाळी वातावरणामुळे जिल्ह्यातील वीट व्यावसायिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी विटा भिजल्याने नुकसान झाले. त्याचबरोबर वेलवर्गीय पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.
आगामी चार दिवस असे राहील वातावरण...
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.
आज, शनिवारी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कमाल तापमान : ३७ ते ३८ डिग्री
कमाल तापमान : २१ ते २४ डिग्री
बाजारभोगाव परिसरात घरांचे नुकसान, पिकांना फटका
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक झालेल्या जोरदार गारपीट व वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गारांचा अक्षरशः मारा झाल्याने रस्त्यांवर व घरासमोरिल अंगणात गारांचा खच साचलेला दिसून आला.
म्हालसवडे परिसरात अवकाळीच्या सरी
म्हालसवडे : म्हालसवडे (ता. करवीर) परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच प्रचंड उष्म्याने नागरिक हैराण झाले असतानाच, दुपारनंतर वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह दुपारी सुरू झालेल्या पावसाच्या संततधार सरी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या.
आंबा परिसराला गारपिटने झोडपले
आंबा: आंबा विशाळगड परिसरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटाने पावसाने हजेरी लावली. यावेळी गारपीटही झाली. दीड तास झालेल्या वादळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचा मोहर गळला. मोहराबरोबर गारांचा सडा पडला घेता. शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
कागल परीसरात अवकाळी पावसाची हजेरी
कागल : कागल शहर व परिसरात आज दुपारी तीननंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला असला तरी वीटभट्टीचालकांची धावपळ उडाली. मातीच्या या विटा भिजू नयेत म्हणून प्लास्टिकचे आवरण झाकण्याचा प्रयत्न सुरू होता.
राधानगरीत अवकाळी पावसाचा तडाखा; कलिंगड, काकडीला फटका
तुरंबे : राधानगरी तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तासभर कोसळलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी कलिंगड, काकडी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे.