कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
By संतोष कनमुसे | Updated: November 17, 2025 19:22 IST2025-11-17T19:21:41+5:302025-11-17T19:22:43+5:30
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याची पाहायला मिळाली आहे.

कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजितदादा आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याची पाहायला मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दोन्ही पक्ष आता एकत्र आले आहेत, विधानसभा निवडणुकीत हायहोल्टेज ठरलेला कागल विधानसभा मतदार संघात आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ कट्टर विरोधक कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत टोकाचा संघर्ष केलेल्या या दोन नेत्यांमध्ये समेट घडविण्यात भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक न लढता राजर्षी शाहू आघाडी मार्फत निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक पत्रक काढून संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली आहे. या आघाडीमुळे संजयबाबा घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा विश्वासघात होणार नाही, असंही मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. तर मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
मुश्रीफ यांनी काढलेल्या पत्रकात काय आहे?
आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
'माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन, असा विश्वास मुश्रीफ यांनी दिला.
'माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे. सदर आघाडी ही कागल शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी व विनाकारण सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी व जनतेला भरभरुन कसे देता येईल, यासाठी झालेली आहे. यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही, असे स्पष्टीकरण मुश्रीफ यांनी दिले.
याबाबत; मंगळवार दि. 18 रोजी चार वाजता मटकरी हॉलमध्ये मी व समरजीतसिंह घाटगे अशी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट करणार आहोत. दरम्यान; कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती (हीस्ट्री रीपीट्स) झालेली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या. कै. शामराव भिवाजी पाटील व कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब, कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब व कै. विक्रमसिंहराजे घाटगे, मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरुन कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल. परंतु यामध्ये "ईडी" ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. "देर आये... दुरुस्त आये.....", असंही मुश्रीफ यांनी पत्रकार म्हटले आहे.