अजित पवार यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:23 IST2026-01-29T12:22:37+5:302026-01-29T12:23:24+5:30
Ajit Pawar Death in Plane Crash: ग्रामीण भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाले.

अजित पवार यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खाते अणि अर्थ खाते असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भरीव निधी दिला. सन २०२४-२५ या अर्थसंकल्पात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने तीन हजार २०० कोटींच्या प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली होती. वेळोवेळी त्यांनी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातही वाढ झाली. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन पहाट झाली.
जलसंपदा मंत्री असताना पवार यांनी राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा यांसारख्या प्रमुख जलसिंचन प्रकल्पांसह लघू व मध्यम सिंचन प्रकल्प मार्गी लागले. त्यांनी दिलेल्या निधीमुळे धरणांची बांधणी, दुरुस्ती, कालव्यांचे आधुनिकीकरण, पाणी गळती रोखणे तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणा झाल्या. अनेक वर्षांपासून रखडलेली सिंचनाची कामे झाली. ग्रामीण भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाले.
शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगांनाही चालना मिळाली. गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ते चंदगड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील किटवडे हा आंतरराज्य प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला होता.
आयटी पार्कसाठी जमीन
अलीकडच्या काळात, म्हणजे एप्रिल २०२५ मध्ये मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ३४ हेक्टर जागा देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वत: मंजुरी दिली होती.