इचलकरंजी : नगरपालिकेच्या नावाने येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बॅँकेत असलेल्या पाणी डिपॉझिट खात्यावर गेल्या बारा वर्षांपासून कोणतेही व्यवहार झाले नाहीत. परिणामी नगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित खाते बंद करावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले.
निवेदनात, नगरपालिकेने १ जानेवारी १९९८ ला कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बॅँकेत पाणी डिपॉझिट चालू खाते सुरू केले होते. त्या खात्यावर सुमारे दोन लाख ९ हजार ८९२ रुपये शिल्लक आहेत. १ जानेवारी २००८ पासून त्यावर कोणतेही व्यवहार करण्यात आले नाहीत. सलग दहा वर्षे कोणताच व्यवहार झाला नसेल, तर रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशानुसार खात्यावर असणारी शिल्लक रक्कम रिझर्व्ह बॅँकेकडे वर्ग करावी लागते, असे नियम असतानाही पालिकेच्या लेखा विभागाला याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येते. ही रक्कम १९९८ ते २०२१ अखेरपर्यंत मुदत ठेव ठेवली असती, तर अंदाजे १६ लाख रुपये झाले असते. एकूणच दुर्लक्षित कारभारामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, असे म्हटले आहे.